नारायणगाव, (वार्ताहर)- जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी स्व. वल्लभ बेनके यांचे कार्य मोठे असून, दूरदृष्टीचा नेता हरपला असल्याची भावना राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. जुन्नर तालुक्याचे माजी आमदार स्व. वल्लभ बेनके यांना त्यांच्या दशक्रिया निमित्त श्रद्धांजली वाहताना बोलत होते. स्व. वल्लभ बेनके यांचे रविवारी 11 फेब्रुवारी रोजी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी त्यांच्या मूळ गावी हिवरे बुद्रुक येथे पार पडला.
यावेळी माजी खासदार आढळराव पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, किरण लहामटे, माजी आमदार बाळासाहेब दांगट, विलास लांडे, भाजप नेत्या आशाताई बुचके, सिताराम गायकर, स्व. वल्लभ बेनके यांचे विश्वासू शरद लेंडे, राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष पांडुरंग पवार, मनसेचे जिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, उबाठा गटाचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, जगन्नाथ शेवाळे, उद्योजक देवेंद्र शहा, मंगलदास बांदल, पंकज महाराज गावडे, बाजार समितीचे सभापती संजय काळे, कृषिरत्न अनिल मेहेर, जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष महादेव वाघ, जगन्नाथ शेवाळे, दादासाहेब बगाड, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध गावातील ग्रामस्थ, आदी मान्यवर व स्व. वल्लभ बेनके यांना मानणारे हजारो चाहते उपस्थित होते.
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, स्व. वल्लभ बेनके दहा वर्षे आजारी असताना त्यांच्या परिवाराने त्यांची सेवा केली. आयुष्य आनंदात घालवले पाहिजे अशी वल्लभ बेनके यांची विचारधारा होती. आंबेगाव तालुक्याच्या बरोबरीने जुन्नर तालुक्याचा विकास झाला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. प्रत्येक माणसाबरोबर मैत्रीचे नाते बनवणारा स्वभाव असल्याने मोठा मित्रपरिवार होता. मतदार संघातील प्रश्न पोट तिडकीने मांडणारा व सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे नेतृत्व गमावले.
कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्याकडून वल्लभ बेनके यांचे अनेक वेळा नाव ऐकले. विचारधारा वेगळी असली तरी गोपीनाथ मुंडे व वल्लभ बेनके चांगले मित्र होते. वडील गमावल्यानंतर घरातील लहान माणूस मोठा होतो हे मी वडिलांच्या निधनानंतर अनुभवले. अतुल बेनके यांच्यावर वडील वल्लभ बेनके यांचा राजकीय वारसा पुढे चालवण्याची तर राजश्री काकूंना पुढील काळात कुटुंब एकत्रित बांधून ठेवण्याची जबाबदारी आहे. वल्लभ बेनके यांचे जुन्नर तालुक्याच्या विकासासाठी मोठे योगदान आहे. ते आपल्यात नसले तरी तालुक्याचा विकास थांबला असे म्हणता येणार नाही. पिढी बदलल्यानंतर विकासाच्या व्याख्या बदलत असतात. त्यामुळे अतुल बेनके आपल्यावर जबाबदारी असून आम्ही तुमच्या सोबत आहोत याची आम्हाला जाणीव आहे.
खासदार अमोल कोल्हे म्हणाले, राजाला रडायची परवानगी नसते कारण राजाला दुःख पचवत आपलं काळीज तलवारीच्या टोकावर ठेवून रयतेचा संसार करायचा असतो. चालताना ठेच लागली तर बाळा तुला लागलं का हे विचारणारी आई असते तर तुला पुढे चालून लढायचं आहे ही प्रेरणा देणारा बाप असतो. त्यामुळे स्व. वल्लभ बेनके यांची पोकळी नेहमी जाणवत राहील. ते ज्यावेळी अहोरात्र काम करीत होते. तेव्हा धर्मपत्नी राजश्रीताई सावली सारख्या त्यांच्याबरोबर उभ्या होत्या. स्व. वल्लभ बेनके यांची प्रशासनावर पकड होती. त्यांचे कृतज्ञता संवेदनशीलता गुण मुलांमध्ये दिसून येतात.
गेली दहा दिवसांत अनेक लोक भेटून गेले. भेटायला आलेले अनेक मान्यवर बेनके साहेबांच्या काळातील मी न ऐकलेले अनुभव सांगायचे. त्यावेळी न ऐकलेले पैलू कानावर आले. तेव्हा नेतृत्व करत असताना एखादा नेता काय काय करीत असतो, ते समजले. ऋणनिर्देश कसे करायचे असा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला आहे. वल्लभ बेनके यांना 1985 साली शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली सेवा करण्याची संधी मिळाली. -अतुल बेनके, आमदार जुन्नर तालुका