मंचर, (प्रतिनिधी) – हिरडा नुकसान भरपाईचा हा प्रश्न सोडविणे शासनाला फार अवघड नाही; परंतु तरीही शासन जुलूम करत आहे. असा आरोप श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी केला.
हिरडा उत्पादकांसाठी भरपाई मिळावी, यासाठी मंचर येथे किसान सभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. अमोल वाघमारे आणि त्याच्या सहकार्यांना राज्यसरकारच्या प्रतिनिधींनी हिरडा उत्पादकांसाठी भरपाई देण्यासाठी कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्याने उपोषण स्थगित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी भेट दिली. हिरडा नुकसान भरपाईचा हा प्रश्न सोडविणे शासनाला फार अवघड नाही. परंतू तरीही शासन असा जुलूम करत आहे. इतर शेतमालाला नुकसान भरपाई मिळते मग हिरड्याला का नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
यापूर्वी सातारा येथे श्रमिक मुक्ती दलाने केलेल्या आंदोलनात मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊन त्याची पूर्तता अद्याप झाली नसल्याचा दाखला देत त्यांनी मुख्यमंत्र्यांनी शिवनेरीवर केलेल्या घोषणेवर लेखी निर्णय झाल्याशिवाय विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझी विधानभवनात बैठक आहे. त्यावेळी मी हिरडा नुकसान भरपाई देण्यासाठी आग्रही भूमिका घेणार आहे; मात्र तरीही सकारात्मक निर्णय झाला नाही. तर श्रमिक मुक्ती दल पुर्ण ताकदीनिशी या आंदोलनात सहभागी होईल. असा इशारा त्यांनी सरकारला दिला.