सातारा – जिल्ह्यातील अपंग बांधवांना सोयीसुविधा मिळण्यासाठी जिल्ह्यात “अकोला पॅटर्न’ राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील अपंग व्यक्तींचे गावनिहाय सर्वेक्षण करण्यात येणार असून प्रत्येक अपंगांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात अपंग भवन बांधण्यात येणार असून त्यासाठी जागा निश्चिती करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी पुढाकार घेतला आहे.
जिल्ह्यात एक लाखांहून अधिक अपंग व्यक्ती असताना कागदोपत्री केवळ 40 ते 45 हजार असल्याची माहिती आहे. अपंगांना अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागते. तब्बल 50 हजार व्यक्तींना केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे जिल्ह्यात प्रत्येक अपंग व्यक्तींना सोयीसुविधा मिळण्यासाठी सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेक्षणाचे काम एका एजन्सीला दिले जाणार आहे. ही खासगी संस्था गावोगावी जाऊन अपंगांचे सर्वेक्षण करणार आहे.
त्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तींच्या अपंगत्वाची तंतोतंत टक्केवारी समोर येणार आहे. काही अपंग व्यक्तींची अपंगत्वाची टक्केवारी कमी असताना शासनाच्या योजनांचा अधिक लाभ घेत असून काही अपंग व्यक्तींवर अन्यायही होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यात अपंग व्यक्तींसाठी राबविण्यात आलेला अकोला पॅटर्न सातारा जिल्ह्यात राबविण्यासाठी रुचेश जयवंशी व ज्ञानेश्वर खिलारी यांनी पुढाकार घेतला आहे. अपंग व्यक्तींसाठी राबविण्यात आलेल्या “अकोला पॅटर्न’चे राज्यभरात कौतुक होत आहे.
यामध्ये प्रत्येक अपंग व्यक्तींला लाभ मिळावे हा प्रमुख उद्देश आहे. अपंग व्यक्तींचे सर्वेक्षण केल्याने त्यांची ऑनलाइन माहिती उपलब्ध आहे. अपंगाचा सर्व्हे दरवर्षी होत असल्याने नवीन व्यक्तींचीही माहिती दरवर्षी मिळत असते. जेणेकरुन, अपंगांच्या योजनांचा लाभ संबंधित व्यक्तीलाच मिळत आहेत. गावोगावी अपंगांचा सर्व्हे होणार असल्याने कोणीही शासकीय योजनांपासून, मदतीपासून वंचित राहणार नाही.
अपंगांचा सर्व्हे करण्यासाठी गावनिहाय खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याद्वारे प्रत्येक अपंग व्यक्तींची माहिती गोळा केली जाणार आहे. या कामासाठी 50 लाखांचा निधी जिल्हा परिषदेकडून, 25 लाख निधी जिल्हा नियोजन समिती तर 25 लाख सीएसआरच्या माध्यमातून उपलब्ध केले जाणार आहेत. अत्याधुनिक मशिनद्वारे गावोगावी कॅम्प लावून अकोला पॅटर्नप्रमाणे जिल्ह्यात हे अभियान यशस्वी करण्यात येणार आहे.
ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी