सचिन इथापे
भुईंज – सध्या ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहोचला मतदारांची मते आपल्याकडे खेचण्यासाठी उमेदवार मतदारांना वेगवेगळ्या पद्धतीने मोहित करण्यासाठी विविध आश्वासनांची खैरात देत आहेत. तरीही चाणाक्ष मतदार प्रत्येक उमेदवाराला झुलवत ठेवून ‘साहेब, चिंता करू नका, तुमचीच हवा आहे, अहो आम्ही तर तुमचेच ना ..! असा प्रत्येकाला दिलासा देत नकार न देण्याचा फंडा आजमावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
निवडणूक म्हटले की श्रीमंत असो किंवा गरीब सर्वांचीच चंगळ असते उमेदवार ही कसलीच कुचराई न करता मतदान होईपर्यंत कार्यकर्ते व मतदारांचे लाड पुरवण्यात मग्न झाले आहेत. अर्ज दाखल केल्यानंतर प्रभागातील जनता, कार्यकर्ते यांना सांभाळून त्यांची मर्जी राखणे जिकरीचे काम मोठ्या शिताफीने करावे लागते. मतांचे दान आपल्या पारड्यात पडावे म्हणून हे सारे सहन करून मतदारांना खुश करण्यासाठी वाटेल ते केले जात आहे.
या निवडणुकीत स्थानिक नेत्यांनी प्रभागासमवेत गावच्या विकासाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप बहुतांश गावातील नागरिकांकडून केला जात आहे, याचा फटका या निवडणुकीत त्यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोशल मिडिया व वर्तमानपत्र यामुळे निवडणूक आणि मतदानाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. उमेदवार मात्र अद्यापही कार्यकर्त्यांची जुळवाजवळ करताना दिसत आहेत. निवडणुकीत होणारा खर्चही सामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. अशा व इतर अनेक राजकीय चर्चेला सध्या ग्रामीण भागात उधाण आले आहे. मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या नाही तर मतदार आपल्याला मतदान करणार नाही आणि आपण घराचा दरवाजा ठोठावला तर नाराजीला सामोरे जावे लागेल मग ते आपल्याला मतदान करतील का ? अशा द्विधा मनस्थितीत प्रचारक व उमेदवार सापडले आहेत.
पॅनल टु पॅनल मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी काही ठिकाणी चौरंगी, पंचरंगी सामना पाहायला मिळणार आहे. पॅनल जास्त असलेल्या ठिकाणी मतदार कोण उमेदवार कोणत्या पॅनलमध्ये उभा आहे याची खात्री करून घ्यावी लागत असल्याचे चित्र आहे. आम्हीच कसा गावचा थांबलेला विकास करू शकतो हे पटवून सांगण्याचा प्रयत्न चालू आहे. काही गावात जुन्यांसह नवीन चेहरे रिंगणात उतरले आहेत.
तरुणांचा अनेक गावात उत्साह असल्याचे चित्र आहे. सध्या गावासाठी पिण्याचे पाणी रस्ते, वीज हे विषय निवडणुकीत ऐरणीवर आले आहेत. ग्रामीण भागात सध्या विविध शेती कमी सुरू आहेत. त्यामुळे सकाळी व रात्री कार्यकर्ते गल्लीबोळातून घरोघरी फिरून निवडणुकीनंतर आम्ही काय करणार आहोत याचा पाढा वाचत आहेत. मतदार मात्र चाणाक्षपणे मतदान तुम्हालाच, असे सांगून उमेदवारांचा उत्साह वाढवताना दिसत आहेत.
मुंबईकर चाकरमान्यांचा भाव वधारला
कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात लॉकडाऊनमध्ये गावागावात पुणे, मुंबई व इतर ठिकाणहून कोण आले यावर अनेकांच्या नजरा होत्या त्यावेळी त्यांना कसे टाळता येईल तसेच गाव बंदी करून कॉरंटाईन करण्यासाठी अनेक स्वयंघोषित नेते पुढे आल्याने अनेक ठिकाणी वाद निर्माण झाले होते. आता तेच वाद घालणारे आपले पॅनलच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी त्या मतदार राजाला त्यांचे कुटुंबासमवेत मतदानासाठी गावात कसे आणता येईल त्यांचा शोध घेऊन नियोजन करण्यात अनेकजण मग्न असल्याचे चित्र आहे.