पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – विद्यार्थी नाट्यकर्मींसाठी महत्त्वाची असलेली फिरोदिया करंडक स्पर्धा आता केवळ पुण्यापुरती मर्यादित न ठेवता ती मुंबईसह महाराष्ट्राच्या अन्य मोठ्या शहरांमध्येही आयोजित करणार असल्याचा निर्धार स्पर्धेच्या ५० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजकांनी केला आहे. या स्पर्धेला बुधवार (दि. १४ फेब्रु) पासून सुरुवात झाली.
कायनेटिक समूहाचे अध्यक्ष डॉ. अरुण फिरोदिया, समूहाच्या संचालिका डॉ. जयश्री फिरोदिया, स्पर्धेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन झाले. याप्रसंगी परीक्षक अमीरा पाटणकर, सुखदा खांडकेकर, सिद्धार्थ केळकर, देवेंद्र भोमे, धीरेश जोशी, तसेच स्पर्धेचे मुख्य संयोजक अजिंक्य कुलकर्णी आदी उपस्थित होते. फिरोदिया करंडकाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त स्पर्धेच्या इतिहासाला उजाळा देणारे एक विशेष प्रदर्शनही स्पर्धास्थळी आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचेही उद्घाटन या वेळी झाले.
या स्पर्धेसाठी मुंबई, नाशिक, कोल्हापूर अशा विविध शहरांमधून आयोजनाची निमंत्रणे येत आहेत. त्यामुळे त्याबाबत विचार सुरू आहे. मुंबईत महाविद्यालयांची संख्या जास्त असल्याने तेथे प्राधान्याने ती सुरू करण्याचा मानस आहे. अन्य शहरांबरोबर भविष्यात परदेशातही तो सुरू करू, असे डॉ. फिरोदिया यांनी सांगितले.
सलग ५० वर्षे ही स्पर्धा आयोजित करणे ही कौतुकास्पद बाब आहे. कलेच्या क्षेत्रात सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव, पुरुषोत्तम करंडक आणि फिरोदिया करंडक या तीन वृद्धिंगत होणार्या संस्था आहेत. त्यामुळेच आता आम्ही याचा विस्तार करण्याचा विचार केल्याचे डॉ. फिरोदिया यांनी सांगितले.
गेल्या पन्नास वर्षांत अनेक व्यक्ती या संस्थेशी जोडल्या गेल्या. अनेक कलाकार यातून तयार झाले. याचे समाधान आहे. प्रत्येक वर्षी नव्या गोष्टींनी ही स्पर्धा बहरते. यंदाचे हे ५० वे वर्ष असल्याने येत्या दहा दिवसांत अनेक नावीण्यपूर्ण गोष्टी करण्याचा आमचा प्रयास असल्याचे, संयोजक कुलकर्णी यांनी सांगितले.
आता कलेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत असे पहिल्या २५ वर्षांत सहभागी कलाकार आणि नंतरच्या २५ वर्षांतील कलाकार यांचा एक स्नेहमेळावा आम्ही भरवणार आहोत. याशिवाय या स्पर्धेच्या माध्यमातून एकत्र येऊन आयुष्याचे जोडीदार बनलेल्या जोडप्यांनाही आम्ही आमंत्रित करत असल्याचे कुलकर्णी म्हणाले.