महादेव जाधव
कोंढवा – राज्यात आतापर्यंत सर्वात मोठी गटबाजी झाल्याचे मानली जात आहे. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस फुटुन अजित पवार यांचा मोठा गट भाजपासोबत जाऊन सत्तेत सामील झाल्याने पूर्व हवेली तालुक्यातील समाविष्ठ गावांतील सत्तासमीकरणे एकदमच बदलले आहे. हा परीसर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. मात्र, आता राष्ट्रवादीचेच दोन गट पडल्याने पक्षाचे पदाधिकारी, कायकर्तेही विभागले गेले आहेत.
तर, यातून विरोधी पक्षांतील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राष्ट्रवादीतील बहुतांशी “इच्छुक’ उमेदवार पक्षातूनच बाहेर पडण्याच्या मन:स्थितीत असून अता कोणता झेंडा हाती घ्यायचा, याची चाचपणी करू लागले आहेत. जुन 2022 मध्ये महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजपा व शिवसेना-शिंदेगटाने राज्यात सत्ता स्थापन केली होती आता अजित पवार यांचा राष्ट्रवादीचा गट महायुतीत सामील झाल्याने आगामी पुणे मनपा निवडणुकीत उमेदवारी, तिकीट वाटपावर याचा मोठा परीणाम होणार असल्याने फुटीर गट सोडून इतर पक्षात गेल्याचे बरे, अशा विचारातून चाचपणीही केली जात आहे. यातून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील अनेक मातब्बर उमेदवार इतर पक्षांच्या गळाला लागण्याची दाट शक्यता आहे.
शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादीचे दोन गट, भाजपा यासह कॉंग्रेस, मनसे व स्थानिक आघाड्या, अपक्षांसह गेल्या दोन-तीन वर्षांपासुन निवडणुकीची तयारी करीत असलेल्या इच्छुकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. नव्याने समाविष्ठ गावांतील अनेक इच्छुक मोठ्या जोमाने तयारीला लागले होते. बैलगाडा शर्यती, क्रिकेट स्पर्धा, होममिनिस्टर अशा कार्यक्रमांतून तसेच स्वखर्चातून विकासकामे करून आपल्या पक्षाचे तसेच स्वत:साठी चांगले वातावरण निर्माण केले होते. परंतु, राज्यात वारंवार घडणाऱ्या राजकीय घडामोडी व सत्तांतर यामुळे कोणकोणाबरोबर युती, आघाडी करणार?
निवडणुका काही केल्या जाहीर होत नसल्याने, कोणता नेता कोणत्या पक्षात किंवा गटात जाणार याचा काहीच अंदाज येत नसल्याने समाविष्ठ गावांसह उपनगरांतील अनेक इच्छुकांनी वेगळ्या पक्षांची वाट धरण्याची तयारी केली आहे. तर, अनेकांनी अपक्ष लढून पालिकेत जाण्याचा संकल्प केला आहे.
निष्ठावानांसाठी मार्ग मोकळे…
हांडेवाडी, होळकरवाडी, औताडेवाडी, वडाचीवाडी, उंड्री, पिसोळी, येवलेवाडी या समाविष्ठ गावांतून प्रथमच पालिका/ नगरपरिषद निवडणूक लढविण्यासाठी अनेकजण प्रबळ दावेदार आहेत. परंतु, गेल्या दोन-तीन वर्षांपासून जोरदार तयारी करुनही काही केल्या निवडणुका जाहीर होत नाहीत त्यातच नव्या नगरपरिषदेचा प्रस्ताही रेंगाळला आहे. प्रभाग रचना रद्द, ओबीसी आरक्षण, सत्ताबदल अशा कारणांमुळे निवडणूक लांबत चालली आहे. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील गटबाजीमुळे निष्ठावान असलेले प्रबळ दावेदारही आता योग्य निर्णय घेण्यासाठी मोकळे झाले आहेत.
इतर पक्षांशी संपर्क…
शिवसेना व राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यामुळे अनेकांची अडचण झाली आहे, अनेकांचा तिकीटाच्या मार्गातील अडसर दूर झाल्याचे बोलले जात आहे. शिवसेना-शिंदेगट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, कॉंग्रेस, मनसे, स्थानिक आघाडी व अपक्ष अशी बहुरंगी निवडणूक आगामी काळात होऊ शकते. युत्या, आघाड्या यावर अनेकांची भिस्त होती. परंतु, आता मनसे, आम आदमी, एमआयएम, बीआरएस असेही पर्याय उपलब्ध असल्याने अनेकांनी या पक्षांशी संपर्क वाढविला आहे.