मुंबई – पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक उद्या होणार आहे. या बैठकीत शिवसेनेच्या सदस्याला समाविष्ट करून घेण्याकरता अजय चौधरी यांनी काल, दि. 9 ऑगस्ट रोजी विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहिले होते. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेची ही मागणी फेटाळत शिंदे गटाकडून दादा भुसे आणि उदय सामंत यांना समाविष्ट करून ठाकरेंना धक्का दिला आहे.
विधिमंडळांचे पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. 9 ऑगस्ट रोजी आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी शिंदे गटातील आणि भाजपच्या प्रत्येकी 9-9 आमदारांनी गोपनियता आणि मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्र्यांना आपल्या विभागाची माहिती व्हावी, मागण्या समजाव्यात याकरता थोडा वेळ मिळावा म्हणून प्रस्तावित 10 ऑगस्टचे पावसाळी अधिवेशन 17 ऑगस्टपर्यंत ढकलण्यात आले.
दरम्यान, पावसाळी अधिवेशनाआधी विधिमंडळाची कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित केली जाते. या बैठकीत सर्व पक्षातील एक सदस्य घेतला जातो. त्यासाठी या समितीवरील सदस्यांच्या नियुक्तीबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह पक्षाच्या गटनेत्यांना सचिवांकडून पाठवण्यात आले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तसे कोणतेही पत्र मिळाले नाही.
त्यामुळे यासंदर्भात शिवसेना गटनेते अजय चौधरी यांनी विधिमंडळ प्रधान सचिवांना पत्र लिहिले. ही कृती नियमबाह्य आणि बेकायदेशीर असल्याचे अजय चौधरी यांनी या पत्रात म्हटले. अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून समितीच्या बैठकीला निमंत्रित करावे. तसेच समितीवर सदस्य नियुक्तीसाठी पत्र द्यावे, अशी मागणी अजय चौधरी यांनी केली होती.