पुणे- कौटुंबिक न्यायालयात मुलांचा ताबा मिळावा म्हणून दाखल होणाऱ्या दाव्यांची सुनावणी आता १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन संपल्यानंतरच सुरु होणार आहे. मात्र, दरम्यानच्या काळात काही तातडीच्या सुनावणी असतील तर त्या दाखल करुन घेतल्या जाणार आहेत. न्यायालयात सध्या एक न्यायाधीश आणि मोजका न्यायालयीन कर्मचारी वर्ग तातडीच्या सुनावणीसाठी उपलब्ध आहे.
सध्या सुरु असलेल्या करोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन सुरु केले आहे. त्यामुळे न्यायालयीन कामकाजही ठप्प आहे. तातडीच्या दाव्यांच्या सुनावणीसाठी न्यायालयात न्यायाधीश आणि न्यायालयीन कर्मचारी वर्ग उपस्थित आहे. न्यायालयात दाखल असलेल्या अनेक दाव्यांमध्ये पक्षकारांचे नुकसान होऊ नये म्हणून एक महिना पुढील तारखा देण्यात आलेल्या आहेत.
तारख्यांच्या सुनावणीसाठी पक्षकार उपस्थित राहू शकला नाही, तर त्याच्या अनुपस्थितीत त्याच्या केसवर परिणाम होऊ नये म्हणून एकतर्फा आदेश देण्यात येऊ नये, अशी सूचना यापूर्वीच उच्च न्यायालयाकडून देण्यात आली आहे. सुरुवातीला कौटुंबिक न्यायालयात दाखल होणाऱ्या मुलांच्या ताब्याच्या सुनावणी याचार एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
मात्र या सुनावणी आता लॉकडाऊन नंतर १४ एप्रिलनंतर होणार आहेत. दी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अॅड. वैशाली चांदणे यांनी सांगितले, सध्या लॉकडाऊनमुळे न्यायालयीन कामकाजाच्या वेळा कमी करण्यात आलेल्या आहेत.
सकाळी अकरा ते दोन यावेळेत न्यायालयाचेकामकाज सुरु असते. तातडीचा दावा दाखल करायचा असेल एक न्यायाधीश उपलब्ध आहेत. लहान मुलांच्या ताब्याच्या सुनावणी आता लॉकडाऊननंतर होणार आहेत, असे अध्यक्षा अॅड. चांदणे यांनी सांगितले.