पाबळ – दिवसेंदिवस वाढते आव्हान होत चाललेल्या करोना व्हायरसवर विजय मिळवण्यासाठी देश पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या परिस्थितीची जाणीव ठेवून शासनाच्या निर्देशाची वाट न पाहता पाबळकरांनी तीन दिवस कडेकोट बंद सुरू करून या लढाईत सहभाग नोंदवला आहे. दि. 2 ते 4 एप्रिल असा बंद अस्तित्वात आणला आहे.
या बंद मध्ये किराणा व्यवसायिकांसह भाजीपाला व्यावसायिकही सहभागी झाले असून मेडिकल सोडून दुग्ध व्यवसायही सकाळी व सायंकाळी ठराविक वेळेत सुरू ठेवण्यात आला आहे. दरम्यान पोलिसांचे सहकार्य असले तरी नागरिकांनीही उत्तम संयमाचे प्रदर्शन करून या बंदचे स्वागत केले आहे.
या बंदच्या काळात कार्यकर्ते, स्वच्छता, जास्तीत जास्त वेळ घरात वास्तव्य, गरजेपुरते बाहेर येणे, परिसरात जंतूनाशकाची फवारणी यांसह आजारी, गर्भवती, अपघाती तसेच बाहेरून आलेल्या मजुरांची विचारपूस, त्यांचे जेवणाची सोय तसेच स्वयंस्फूर्त कार्यकर्त्यांची भोजनाची व्यवस्था केली आहे.
या बंदसाठी ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी, बलुतेदार क्रांति प्रतिष्ठानचे ऍम्ब्युलन्ससह आपत्कालीन पथक, स्थानिक तरुण कार्यकर्ते, तसेच सर्व स्तरातील मुख्य पदाधिकारी या मोहिमेत सहकार्य करत आहे.
त्या कुटुंबांना सहकार्य करणार
दरम्यान बुलढाणा येथील वंजारी समाजाची शेतमजूरीसाठी आलेली पंधरा कुटुंबे (47 व्यक्ती) कामे नसल्याने पाबळ येथे अडकली होती. त्या सर्वांना भेटून त्यांची नाव नोंदणी करण्यात आली. त्यांना आठ दिवस पुरेल इतका भाजीपाला पुरवण्यात आला. धान्य मिळवून देण्यासाठी ग्रामपंचायत कडून योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.