प्रशांत जाधव
सातारा – पुणे-बंगळरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी वाहतूक पोलीस प्रयत्न करत आहेत. त्यातूनच बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करत महामार्ग वाहतूक पोलिसांच्या भुईंज केंद्रातील कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षभरात 73 लाख 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
महामार्गावर भुईंज केंद्राच्या हद्दीत असलेल्या टप्प्यात बेशिस्त वाहनचालकांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या स्पीडगनमार्फत लक्ष ठेवले जात आहे.
नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना एसएमएसद्वारे दंडाची पावती पाठवून विशिष्ट तारखेत दंड भरण्याची मुदत दिली जाते. पाच पेक्षा अधिक वेळा नियम मोडणाऱ्यांन नोटीसही पाठवली जाते. त्याकडे दुर्लक्ष करून दंड भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांविरुद्ध आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी जागेवरच कारवाई सुरू केली आहे. यासाठी ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षात 29 हजार 309 वाहनचालकांकडून 73 लाख 20 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
महामार्गावर वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनांवर स्पीडगनची करडी नजर असून नियम मोडणाऱ्या वाहनधारकांना दंडाची रक्कम एसएमएसद्वारे कळवली जात आहे. वेगमर्यादा ओलांडणाऱ्या एक हजार 469, मार्गिकेची शिस्त मोडणाऱ्या (लेन कटींग) तीन हजार 660, मद्यपान करून वाहन चालविणे (ड्रंक अँड ड्राईव्ह) एक, बेदरकार (रॅश ड्रायव्हिंग) वाहन चालवणाऱ्या 80, रिप्लेक्टर नसलेल्या 104, फॅन्सी नंबरप्लेट 11, सीट बेल्ट न लावणाऱ्या चार हजार 645, अवैध प्रवासी वाहतूक एक, नो पार्किंग 41, नो एंट्री 52, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणाऱ्या 93 वाहनचालकांवर महामार्ग पोलिसांच्या भुईंज केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई केली आहे.
महामार्गावरील अपघात टाळून लोकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी महामार्ग पोलीस वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. भुईंज केंद्रातील पोलीस कर्मचारी खंबाटकी ते शेंद्रे या परिसरात दररोज वाहतूक नियमन व नियंत्रण करत आहेत.
“एस’ कॉर्नरवर आता वेगमर्यादा
महामार्गावर सर्वात जास्त बळी घेणारा सातारा-पुणे लेनवरील खंबाटकी बोगद्याबाहेरील “एस कॉर्नर’ हा “मृत्यूचे वळण’ म्हणून ओळखला जात आहे. या तीव्र वळणावर अनेक जीवघेणे अपघात झाले असून आतापर्यंत शेकडो लोकांचा बळी या वळणाने घेतला आहे. त्यामुळे या एस कॉर्नरवर अपघात टाळण्यासाठी महामार्ग पोलिसांनी दुचाकी व अवजड वाहनांसाठी ताशी 40 किमी आणि अन्य चारचाकी वाहनांसाठी ताशी 50 किमी, अशी वेगमर्यादा निश्चित केली आहे. या वळणापासून काही अंतरावर स्पीडगन बसविण्यात येणार असून वेगमर्यादा ओलांडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. वाहनधारकांनी वेगावर नियंत्रण ठेवल्यास अपघातांची संख्या कमी होईल, असा विश्वास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुरव यांनी व्यक्त केला.
एका वर्षात 325 जणांनी गमावला जीव
महामार्गावरील अपघातांमध्ये राज्यात सातारा जिल्ह्याचा नंबर बारावा लागतो. 2019 या वर्षात जिल्ह्यात महामार्गावर 634 अपघात झाले. त्यात तब्बल 325 जणांनी आपला जीव गमावला तर 506 जण गंभीर जखमी झाल्याचे धक्कादायक वास्तव आहे. राज्यात गेल्या वर्षात महामार्गावर एकूण 32 हजार 876 अपघातांमध्ये 12 हजार 565 जणांनी जीव गमावला तर 28 हजार 898 जणांना गंभीर दुखापत झाली.