मुंबई – बिहार राज्यातील समता पक्षाच्या शिष्टमंडळाने आज ठाणे येथील निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत शिष्टमंडळाने समता पक्षाला पुन्हा एकदा मशाल चिन्ह मिळावे यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे. अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्विटरवरून दिली आहे.
दरम्यान, समता पक्ष हा बिहारमधील जुना पक्ष असून ‘मशाल’ हे या पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह आहे. मात्र राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर निवडणूक आयोगाने हे चिन्ह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला होता.
या निर्णयाविरोधात समता पक्ष सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून ज्या पद्धतीने आम्हाला शिवसेनेचे धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मिळाले त्याचप्रमाणे त्यांनाही त्यांचे ‘मशाल’ हे अधिकृत पक्षचिन्ह मिळावे यासाठी सहकार्य करावे अशी विनंती समता पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.
यावेळी समता पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख उदय मंडल व त्यांचे सर्व सहकारी, शिवसेनेचे विभागप्रमुख एकनाथ भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते.