नवी दिल्ली – भारतीय नौदलाचे वरीष्ठ कमांडर हिंद महासागरात चीनच्या वाढत्या लष्करी स्थितीच्या पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षेचा तीन दिवस आढावा घेणार आहेत. सोमवार पासून हे काम सुरू झाले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, संरक्षणदलाच्या तिन्ही सेनादलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे आणि एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी हे दिल्लीत होणाऱ्या परिषदेत नौदल कमांडरांशी संवाद साधणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
नौदल कमांडर्स कॉन्फरन्स हा सर्वोच्च-स्तरीय द्विवार्षिक कार्यक्रम आहे ज्यात नौदल कमांडर्समध्ये विचारविमर्श होऊन महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतले जातात. भारतीय नौदलाचे वरिष्ठ अधिकारी मागील सहा महिन्यांत हाती घेतलेल्या प्रमुख ऑपरेशनल, मटेरिअल, लॉजिस्टिक, मानव संसाधन, प्रशिक्षण आणि प्रशासकीय उपक्रमांचा आढावा घेतील, असे नौदलाने सांगितले.
पुढील काही महिन्यांत कोणत्या कोणत्या विषयाला प्राधान्य द्यायचे यावरही या परिषदेत विचारमंथन केले जाईल. देशाच्या सर्वांगीण आर्थिक वाढीसाठी सागरी सुरक्षा महत्वाची आहे. 2047 पर्यंत संपूर्ण ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्याच्या अनुषंगाने ‘मेक इन इंडिया’द्वारे स्वदेशीकरण वाढवण्यावर लक्ष केंद्रित करून सध्या सुरू असलेल्या नौदल प्रकल्पांचाही कमांडर आढावा घेतील, असे नौदलाने सांगितले.भारतीय नौदलाच्या स्वदेशीकरण, नवकल्पना आणि तंत्रज्ञान उपक्रमांचे प्रात्यक्षिकही परिषदेच्या पार्श्वभूमीवर नियोजित आहे.