नवी दिल्ली – उत्तरप्रदेशातील घोसी विधानसभा मतदारसंघात उद्या (मंगळवार) पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. सत्तारूढ भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या समाजवादी पक्षात (सप) पोटनिवडणुकीसाठी थेट लढत होत आहे. तसे असले तरी त्या पोटनिवडणुकीला भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि इंडिया या विरोधकांच्या आघाडीतील पहिल्या राजकीय लढाईचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
सपला रामराम ठोकून दारासिंह चौहान यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने घोसीत पोटनिवडणूक होत आहे. भाजपने चौहान यांना, तर सपने सुधाकर सिंह यांना उमेदवारी दिली आहे. इंडियाच्या स्थापनेनंतर होत असलेल्या त्या पोटनिवडणुकीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. कॉंग्रेस, माकप, भाकप, रालोद या इंडियातील घटक पक्षांनी सपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. तर, अपना दल (सोनेलाल), निषाद पक्ष आणि सुभासप हे एनडीएमधील घटक पक्ष भाजप उमेदवाराच्या पाठिशी उभे राहिले आहेत.
पोटनिवणुकीच्या रिंगणात एकूण 10 उमेदवार आहेत. मात्र, प्रमुख लढत भाजप आणि सप उमेदवारांमध्येच होईल. घोसी मतदारसंघात सुमारे 4.38 लाख मतदार आहेत. पोटनिवडणुकीचा निकाल 8 सप्टेंबरला जाहीर होईल. त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असेल. उत्तरप्रदेशात विधानसभेच्या एकूण 403 जागा आहेत.
सत्तारूढ भाजपकडे विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक संख्याबळापेक्षा अधिक जागा आहेत. त्यामुळे पोटनिवडणुकीच्या निकालाने विधानसभेतील संख्याबळावर नगण्य परिणाम होईल. मात्र, पोटनिवडणुकीत बाजी मारल्यास भाजपचा उत्तरप्रदेशातील प्रभाव कायम असल्याचे सिद्ध होईल. त्याउलट, सपचा विजय झाल्यास त्या पक्षाप्रमाणेच इंडियाचे मनोबल उंचावेल. आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या 8 महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या राजकीय महासंग्रामाआधी उत्तरप्रदेशमधील जनतेच्या मुडची चाचपणी म्हणून पोटनिवडणुकीकडे पाहिले जात आहे.