हिंगोली – हिंगोली जिल्ह्यात रविवारी (दि. 26 नोव्हेंबर) मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास विजाच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. यात औंढा नागनाथ तालुक्यातील गोजेगाव येथे शेतात वेचणी केलेला कापुस आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राजु शंकर जायभाये वय (26) वर्ष असं या तरुणाचं नाव आहे.
गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काल मध्यरात्री रविवारी हिंगोली जिल्ह्यातील गोजेगाव, चीमेगाव शिवारात वेचणी केलेला कापुस झाकण्यासाठी तीघेजण शेतात थांबले होते. राजु जायभाये, विष्णू सीताराम नागरे आणि नवनाथ गिते हे तिघे जन रात्री शेतात असतांना 3 वाजताच्या सुमारास अंगावर विज पडून राजु जायभाये यांचा यात मृत्यु झाला तर सोबतचे दोघेजण किरकोळ जखमी झाले आहे. या घटनेने जायभाये कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
मी शेतात जाऊन लगेच येतो म्हणणारं लेकरू आत्ता परत कधीच येणार नाही यामुळे जायभाये कुटुंब हंबरडा फोडून रडत होते. मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. काल मध्यरात्री झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले कपाशीचे पिक आत्ता अवकाळी पावसाने उध्वस्त झाले व तूर पूर्ण पणे आडवी झाली आहे व रब्बीतील गहू, हरभरा या कोवळ्या पिकांना देखील यांचा मोठा फटका बसला आहे.