सिंधुदुर्ग – राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी तब्बल 12 वर्षानंतर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली आहे. दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्या कणकवली येथील निवासस्थानी भेट घेतली असून या दोघांमध्ये एक तास चर्चा झाली आहे. एकेकाळी एकमेकांना पाण्यात बघणारे कट्टर शत्रू भेटल्याने राजकीय वर्तुळात या दोघांच्या भेटीची चर्चा होत आहे.
दीपक केसरकर यांनी नारायण राणे यांच्या कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्कांना उधाण आले आहे. मात्र आपण घेतलेली भेट ही जिल्ह्याच्या विकासासाठी असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.
या भेटीनंतर दीपक केसरकर म्हणाले, नारायण राणे यांची भेट नेहमीच जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भातच असते आणि ते विकासाच्या संदर्भात चांगले मार्गदर्शन करत असतात.
लवकरच आम्ही एकत्र बसू आणि जिल्ह्यांमध्ये नवीन काय करता येईल यावर चर्चा करू. पण आजच्या भेटीचे कारण असे की, काही डीएड बेरोजगार नारायण राणे यांना भेटायला आले होते. त्यानंतर त्यांनी मला फोन केला आणि मी मुद्दाम याठिकाणी त्यांना भेटायला आलो. डीएड बेरोजगार विद्यार्थ्यांच्या काही वेगळ्या स्वरुपाच्या समस्या आहेत, असे त्यांनी सांगितले.