शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागच्या अनेक महिन्यांपासून बंद असणारे शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याची प्रतिक्षा सर्वजण करत आहेत. मात्र, राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता कोणत्याही शाळा किंवा महाविद्यालये सुरू होतील असे वाटत नसल्याचे दिसत आहे. त्यातच शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी होणाऱ्या 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षा यंदा मे पूर्वी घेणे शक्य नसल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. तसेच दिवाळीनंतर इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालये सुरु करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. परीक्षा व पुढील शैक्षणिक वर्ष यासाठी उशीर होऊ नये म्हणून दिवाळीनंतर मोठ्या विद्यार्थ्यांसाठी ताबडतोब शाळा व महाविद्यालये सुरू कराव्यात, असा आमच्या विभागाचा मानस असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना सांगितले.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यावेळी बोलताना, “दिवाळीनंतर लगेचच इयत्ता 9 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु करण्याचा विभागाचा मानस असून दोन सत्रात किंवा एका दिवसाआड वर्ग भरवण्यात येतील. विद्यार्थ्यांनी नियमांचे नीट पालन केले तर कोरोनाची भीती वाटणार नाही. आम्ही 10 आणि 12 वी च्या बोर्डाच्या परीक्षा मे मध्ये आयोजित करण्याचा विचार करत आहोत. आणि शक्य असल्यास दिवाळीनंतर लगेचच शाळा सुरु करण्यात येतील.
दरम्यान, पावसाळ्यात ग्रामीण भागात येणाऱ्या अडचणींमुळे त्या काळात परीक्षा घेणे टाळावे, असे विभागातील काही अधिकाऱ्यांनी सुचवले आहे. पुढील वर्षी मे महिन्यात किंवा पावसाळ्यानंतर सप्टेंबर महिन्यात आपण परीक्षा आयोजित करु शकतो. परंतु, सप्टेंबरमध्ये परीक्षा घेतल्यास अजून एक वर्ष वाया जाईल आणि ते टाळण्यासठी परीक्षा मे दरम्यान घेण्याचा विचार आहे. परीक्षेपूर्वी प्रॉक्टिकल्स सह अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांना काही अवधी लागेल. पेपर सेट करणे, प्रिटिंग, वाहतूक यासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागेल. नोव्हेंबरमध्ये शाळा सुरु केल्या तरच हे सर्व शक्य होईल, असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
इयत्ता 1 ते 8 साठी शाळा लगेचच सुरु केल्या जाणार नाहीत. इयत्ता 9 आणि त्यापुढील विद्यार्थ्यांसाठी पहिल्या टप्प्यात शाळा सुरु करण्यात येतील. मात्र इतर विद्यार्थ्यासाठी ऑनलाईन वर्ग सुरु राहतील. दरम्यान, शाळा सुरु करण्याबाबत अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. शाळा सुरु केल्यानंतर त्या पुन्ह बंद कराव्या लागू नयेत या विचारात आम्ही आहोत. कारण कोरोनामुळे दिल्ली, आंध्र प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये शाळा सुरु केल्यानंतर पुन्हा बंद कराव्या लागल्या होत्या.