पाटणा – बिहारमधील निवडणूक अखेरच्या टप्प्यात आली आहे. नोव्हेंबरला तिस-या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान असून 10 नोव्हेंबरला निकाल आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सत्ता कायम राखण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. तर मित्रपक्ष भाजपनंही पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गजांच्या सभांचं आयोजन करून बिहार पिंजून काढला आहे. संयुक्त जनता दल आणि भारतीय जनता पक्षासमोर राष्ट्रीय जनता दल आणि कॉंग्रेसनं आव्हान उभं केलं आहे.
विद्यमान मुखमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी यंदाची विधानसभा निवडणूक आव्हानात्मक आहे. भाजपसोबत निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या संयुक्त जनता दलासमोर राजद आणि कॉंग्रेसनं तगडं आव्हान उभं केलं आहे. त्यातच केंद्रात एनडीएचा घटकपक्ष असलेल्या लोकजनशक्ती पक्षानं बिहारमध्ये एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. लोकजनशक्ती पक्ष अगदी उघडपणे कुमार यांच्याविरोधात उतरला आहे. त्यांनी संयुक्त जनता पक्षाच्या उमेदवारांविरोधात सगळ्याच जागांवर उमेदवार दिले आहेत. मात्र भाजपच्या जागांवर उमेदवार दिलेले नाहीत. त्यामुळे जनता दलाच्या अडचणी वाढल्या आहेत.
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार शिगेला पोहोचला असताना, पूर्णियामध्ये एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक अतिशय मोठी घोषणा केली. “वर्ष 2020 ची ही माझी शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे माझ्या पक्षाला विजयी करा. ज्याचा शेवट गोड, ते सगळंच गोड. आज निवडणुकीच्य प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. परवा मतदान आहे आणि ही माझी शेवटची निवडणूक आहे. आमच्या उमेदवाराला विजयी कराल ना,’ असं कुमार यांनी उपस्थितांशी संवाद साधताना म्हटलं.
एका बाजूला चिराग पासवान सातत्यानं नितीश कुमार यांना लक्ष्य करत आहेत. आज पंतप्रधान मोदींसमोर नतमस्तक होणारे नितीश निवडणूक निकालानंतर तेजस्वी यादवांसमोर नतमस्तक होतील. ते खुर्ची टिकवण्यासाठी राष्ट्रीय जनता दलासोबत जातील, अशा शब्दांत पासवान मुख्यमंत्र्यांना लक्ष करत आहेत. तर नितीश कुमार यांचं वय वाढलं आहे. त्यामुळे त्यांना रिटायर करा, असं आवाहन तेजस्वी यादव बिहारी जनतेला करत आहेत.