संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा
नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरवर वारंवार आपला अधिकार गाजवणाऱ्या पाकिस्तानला भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चांगलाच इशारा दिला आहे. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग आहे हे पाकिस्तानने मुळीच विसरु नये. पूर्वीही पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग होता, आताही आहे आणि यापुढेही असेल असे म्हणत भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे.
Pakistan should understand one thing clearly that entire Pok belonged to India & today also we consider PoK as part of India. In future also, it will remain with India. This is our parliament's resolution: Defence Minister Rajnath Singh at a rally in Bihar's Muzaffarpur pic.twitter.com/10TH0lDCo5
— ANI (@ANI) November 4, 2020
बिहारच्या मुझ्झफरपूर या ठिकाणी एका प्रचारसभेत ते बोलत होते. बाल्टिस्तानमध्ये ज्या कारवाया पाकिस्तान करतो आहे त्या पाकिस्तानने थांबवाव्यात असेही त्यांनी म्हटले आहे. तसेच पाकिस्तानने हे लक्षात घेतले पाहिजे पीओके हा भारताचाच भाग आहे. आमच्या संसदेचा हा प्रस्ताव आहे असेही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यानी गिलगिट बाल्टिस्तानला प्रांताचा दर्जा देण्याची घोषणा केली. पाकिस्तानच्या या निर्णयाचा भारताने तीव्र निषेध केला आहे. पीओकेमध्ये कोणताही बदल स्वीकारला जाणार नाही हे सांगत पाकिस्तानला भारताने इशारा दिला आहे. गिलगिट-बाल्टिस्तान हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे.
दरम्यान इम्रान खान सरकार या प्रांतात विधानसभा निवडणूक घेण्याच्या तयारीत आहे. चीनचे कर्ज आणि दबावानंतर पाकिस्तानने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. याच मुद्द्यावरुन भारताने पाकिस्तानवर टीका केली होती. आता आज केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही पाकिस्तानला ठणकावत इशारा दिला आहे.