संयुक्तराष्ट्रे – करोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा गैरफायदा घेऊन पाकिस्तानने भारतातीाल दहशतवादाला मदत केली आणि सीमापार दहशतवादाला खतपाणी घातले, असा दावा भारताच्या वतीने संयुक्त राष्ट्रांत करण्यात आला आहे. धार्मिक आधारावर भारतात फूट पाडण्याचाही प्रयत्न या काळात पाकिस्तानकडून केला गेला, असेही भारताने म्हटले आहे.
वर्णद्वेष, धार्मिक विद्वेष आणि असहिष्णुता या विषयीच्या एका संवाद कार्यक्रमात बोलताना भारताचे संयुक्त राष्ट्रातील एक कायम सेक्रेटरी आशिष शर्मा यांनी हा दावा केला. त्यांनी नमूद केले की पाकिस्तानकडून केली जाणारी द्वेषाची भाषा ही भारतातील एका समूहाच्या विरोधात नव्हती तर ती उच्चपदस्थ भारतीय राजकीय नेत्यांच्याही विरोधात होती.
करोनाच्या काळात साऱ्या जगाचा कारभार ठप्प असताना पाकिस्तानने मात्र या स्थितीचा गैरफायदा घेऊन भारतातील दहशतवादाला मदत आणि प्रोत्साहन दिले, असे ते म्हणाले. आमच्या देशात हिंसाचार माजवण्यासाठी त्यांनी द्वेषमुलक व भडक वक्तव्ये सातत्याने केली. तथापि त्यांच्या या वक्तव्याला भारतातील घटकांनी धूप घातली नाही.
भारतात सर्वच जातीधर्म सलोख्याने राहात असल्याने पाकिस्तानचे प्रयत्न वाया गेले, असे ते म्हणाले. पाकिस्तानने आधी आपल्या देशातील धार्मिक सलोखा जपावा आणि आपल्याच देशातील जनतेच्या विरोधातील असहिष्णुतेचे धोरण सोडून द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.