कटिहार – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एकत्रितपणे बिहारला लुटले. त्याची जाणीव झाल्याने आता बिहारमधील मतदार सत्ताबदलाच्या मूडमध्ये आहेत, असा दावा कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला.
बिहार विधानसभा निवडणुकीतील प्रचारासाठी राहुल यांची येथे सभा झाली. त्यावेळी त्यांनी मोदी आणि नितीश यांच्यावर टीकेची झोड उठवली. लॉकडाऊनच्या काळात घरी पोहचण्यासाठी बिहारमधील स्थलांतरित कामगारांना मोठी पायपीट करावी लागली. मात्र, त्यांच्या मदतीसाठी मोदी किंवा नितीश यांनी काहीच केले नाही.
त्याउलट, कॉंग्रेसने स्थलांतरित कामगारांसाठी वाहनांची व्यवस्था केली. सत्तेत नसल्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात मदत करू शकलो नाही. पण, जमेल तितके आम्ही सहकार्य आम्ही केले, असे ते म्हणाले.
नोटाबंदीचा फटका गरिबांना बसला. मात्र, निवडक बड्या उद्योगपतींना त्या निर्णयाचा लाभ झाला. जीएसटीमुळे छोट्या दुकानदारांचे नुकसान झाले. आता केंद्रीय कृषी कायद्यांमुळे शेतकरी संतापले आहेत. विकास आणि रोजगाराची आश्वासने पूर्ण करण्यात मोदी आणि नितीश यांना सपशेल अपयश आले, असा आरोपही राहुल यांनी केला.