मुंबई – देशामध्ये कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या सुरुवातीपासूनच राज्य रुग्ण संख्येच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर राहिलं आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येचा आलेख खाली पडू लागल्याचं आशादायक चित्र दिसतंय.
राज्यात सामान्य नागरिकांसह कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात कोरोना बाधा झाल्याची प्रकरणे समोर आली होती. मात्र आता राज्यातील नव्या बाधितांची संख्या कमी होत असतानाच पोलीस दलातील कोरोना बाधितांची संख्याही घटू लागली असल्याची सुखद आकडेवारी समोर आली आहे.
राज्यात गेल्या २४ तासांमध्ये केवळ ७ पोलिसांना कोरोना बाधा झाली असून मार्चनंतर प्रथमच हा आकडा एक अंकी संख्येवर स्थिरावला आहे. राज्यात आजतागायत २६,२५४ पोलीस कर्मचारी कोरोना बाधित झाले असून २८२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूंमध्ये २७ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
तर २४,३८३ पोलीस कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली असून १५८९ कर्मचारी उपचार घेत आहेत. प्राप्त माहितीनुसार गेल्या २४ तासांमध्ये दोन कोरोनाबाधित पोलिसांचा मृत्यू झाला आहे.