सांगली – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एनडीएमध्ये यावे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
रामदास आठवले गुरुवारी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील गावांना भेटी दिल्या आहेत. त्यावेळी ते बोलत होते.
रामदास आठवले म्हणाले कि, पवार साहेबांबद्दल मला आदर आहे. पवार यांच्याबद्दल मी वक्तव्ये केली होती. देशाचा विकास करायचा असेल तर शरद पवार यांनी एनडीएमध्ये यावे आणि पंतप्रधान मोदी यांच्या खांद्याला खांदा लावून काम करावे. यामध्ये त्यांचा अपमान करण्याची अथवा त्यांना डिवचण्याची भूमिका माझी अजिबात नव्हती, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
शरद पवार यांनी आता शिवसेनेसोबत न राहता भाजप आणि आरपीआयसोबत यावे. माझे केवळ एवढेच मत होते. पवारसाहेब माझ्याबद्दल काही बोलले तरी मला त्याचे वाईट वाटत नाही. ते आमचे नेते आहे. मी कधीही कोणावर टीका-टिपण्णी करत नाही. मी केवळ माझे मत मांडतो, असेही आठवलेंनी सांगितले.
एकनाथ खडसे राष्ट्रवादीत गेल्याने त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे अन्य काही आमदार पक्षांतर करणार असल्याची चर्चा आहे. परंतु, त्या निव्वळ अफवा असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. महाविकास आघाडीतील सर्व मंत्री पदावर नेमणूक झालेली आहे. त्यामुळे तिकडे जाऊन मंत्रिपद मिळेल किंवा काही फायदा मिळणार नाही. त्यामुळे भाजपचे आमदार तिकडे जातील असे मला वाटत नाही, असेही रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.