मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थकवा जाणवत असल्याने त्यांनी राहत्या घऱी क्वारंटाइन झाले आहेत. मात्र प्रकृती ठीक नसतानाही अजित पवार यांचे काम करण्याचे काही थांबले नसल्याचे दिसत आहे. ‘देवगिरी’ या त्यांच्या शासकीय निवासस्थानातून त्यांचे कार्यालयीन कामकाज नियमित सुरु आहे.
अजित पवार आवश्यकतेनुसार व्हीसी व दूरध्वनीद्वारे अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. अजित पवार देवगिरीमधूनच अधिकाऱ्यांना सूचना देत असून पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा, मदतकार्याचा आढावा घेत आहे. याशिवाय फाईल्स पुढे पाठवणे, कार्यालयीन कामं निवासस्थानावरुन नियमित व सुरळीत सुरु असल्याची माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
अजित पवार हे ‘देवगिरी’ निवासस्थानाहून व्हीसीद्वारे सर्व बैठकांसाठी उपलब्ध असून त्यांच्या गृहविलगीकरण काळातही राज्य शासनाची निर्णयप्रक्रिया सुरु राहील, याची पूर्ण दक्षता घेण्यात आली आहे. असेही उपमुख्यमंत्री कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. अजित पवार यांना थकवा जाणवत असल्याने पूर्वकाळजी म्हणून घरातच क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे.
अजित पवार यांना करोना झाल्याचे वृत्त पार्थ पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना फेटाळले. दरम्यान अजित पवार यांच्या सर्व बैठका तसंच सकाळी होणारा जनता दरबार रद्द करण्यात आला होता. यावेळी कोणतंही कारण सांगण्यात आलं नव्हतं.