अमरावती – परतीच्या पावसामुळे राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पिकं पावसात वाहून गेली आहेत. शेतकरी हवालदील झाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांसह राज्यातील अनेक नेत्यांनी नुकसान पाहणी दौरे केले. शेतकऱ्यांना धीर दिला. मात्र, प्रत्यक्ष मदत कधी मिळणार यासाठी शेतकरी आस लावून बसले आहेत.
जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. अमरावतीतील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सोयाबीन आणि कापूस पिकांची पाहणी करून बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.
“शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिवाळीच्या अगोदर मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल”, असं आश्वासन यावेळी मंत्री बच्चू कडू यांनी दिलं आहे.