ऐझॉल – आसाम आणि मिझोरामच्या नागरीकांमध्ये सीमा भागात मोठ्या प्रमाणात चकमकी झाल्यामुळे या दोन राज्यांच्या सीमेवर तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यात अनेक जण जखमी झाले आहेत.
मिझोरामचा कोलासीब जिल्हा आणि आसाम मधील कचर जिल्ह्याच्या सीमेवर या चकमकी झाल्या. मिझोरामने या चकमकींनंतर सीमा भागात भारतीय राखीव पोलिस दलाच्या बटालियन्स तैनात केल्या.
दोन्ही राज्यांतील नागरीकांमध्ये मिझोरामच्या कोलासीब जिल्ह्यातील वैरेंगटे गावात चकमकी झाल्या. त्या बराच काळ सुरू होंत्या. पोलिसांनी बळाचा वापर करून या चकमकी नियंत्रणात आणल्या असून आता तेथील स्थिती नियंत्रणात आहे.
वैरेंगटे गावापासून तीन किमी अंतरावर तेथील स्थानिक स्वयंसेवकांनी सीमा भागातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी एक तात्पुरती शेड उभारली होती. त्याची मोडतोड आसामच्या हद्दीत राहणाऱ्या नागरीकांनी केल्यानंतर ही चकमक सुरू झाली असे सांगण्यात येते.