मुंबई – राज्यातील मंदिरं खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झालेला पत्रव्यवहार राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. राज्यपालांनी लिहिलेल्या पत्रामध्ये, ‘तुम्ही हिंदुत्वाचे कट्टर समर्थक, मग देव कुलुपबंद का? याबाबत तुम्हाला दैवी संकेत मिळतात का?’ असे प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर उपस्थित केले आहेत.
तर, ‘मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्यांचे हसत स्वागत करणं माझ्या हिंदुत्त्वात बसत नाही’ असं प्रतिउत्तर मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे दिलं आहे.
या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. याबाबत बोलताना आंबेडकर यांनी, ‘राज्यपालांची भूमिका योग्यच आहे. केंद्राच्या निर्णयाचं पालन होतं की नाही, हे पाहण्याचा आणि मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा त्यांना अधिकार आहे.’ अशी भूमिका मांडली.
अदब पाळला नाही
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यादरम्यान झालेल्या पत्रव्यवहारात अदब पाळला गेला नाही अशी खंतही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
भाजपच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा नाही
यावेळी, मंदिरं सुरु करण्याबाबत राज्यात भाजपने छेडलेल्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा नाही असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. ‘शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही. राज्यात भाजप व शिवसेनेदरम्यान सॉफ्ट व हार्ड हिंदुत्वाचा लढा सुरु आहे.’ असा दावाही त्यांनी केला.