दुबई – लोकेश राहुलने त्याच्या यष्टिरक्षणाच्या अतिरिक्त जबाबदारीचे दडपण न घेता फलंदाजीवरच जास्त लक्ष केंद्रित करावे, असे मत वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा याने व्यक्त केले आहे.
अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत राहुल पंजाब संघाचा कर्णधार आहे. तो संघातील प्रमुख फलंदाज असून तोच यष्टिरक्षणाचीही जबाबदारी सांभाळत आहे. त्याच्या या तिहेरी भूमिकेमुळे त्याच्यावर काहीवेळा दडपण येत आहे. त्याने या तीनही गोष्टींकडे सरस कामगिरी व्हावी यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा फलंदाजीवर जास्त लक्ष द्यावे कारण तो संघाचा अनुभवी फलंदाज म्हणून सरस कामगिरी करणे महत्त्वाचे आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळणार आहे. त्यात राहुलकडेच यष्टिरक्षणाचीही जबाबदारी येण्याची शक्यता आहे. मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या मालिकेत ते ठीक आहे, पण कसोटीसाठीही त्याच्यावरच भार टाकला तर त्याची फलंदाजी कोमेजून जाण्याचा धोका आहे, असेही मत लारा याने व्यक्त केले.
या वर्षाच्या प्रारंभ भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध मालिका खेळली. त्यात राहुलकडेच फलंदाजीसह यष्टिरक्षणाची जबाबदारी होती. त्याने या दोन्ही भूमिका समर्थपणे सांभाळल्या. मात्र, हे सातत्याने झाले तर त्याची फलंदाजी सरस होणार नाही. यष्टिरक्षणाचे दडपण घेण्यापेक्षा त्याने फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले तर संघाची फलंदाजी भक्कम होणार आहे. जास्तीत जास्त धावा कशा करता येतील व त्यासाठी प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर दडपण कसे राखता येईल, याचा विचारही त्याने केला पाहिजे तरच तो यशस्वी होईल, असेही लारा म्हणाला.