Rahul Gandhi On Pm Narendra Modi Bhandara Sabha – पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासाच्या, महागाईच्या आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर कधीच बोलत नाहीत. त्यांच्याकडून 24 तास धर्माचे राजकारण सुरु असते, असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. पहिल्या टप्प्यातील महाराष्ट्रातील पाच मतदारसंघाच्या मतदानासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. नुकतेच चंद्रपूर आणि नागपुरच्या कन्हान येथे पंतप्रधानांच्या दोन भव्य सभा पार पडल्यानंतर आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी हे देखील मैदानात उतरले आहेत. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे राहुल गांधी यांची आज सभा पार पडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप सरकारच्या नीतींवर जोरदार हल्लाबोल केला. (Lok Sabha Election 2024)
भंडारा-गोंदिया लोकसभेचे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रशांत पडोळे यांच्यासह पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली या पाचही लोकसभेच्या उमेदवारांसाठी ही प्रचार सभा झाली. राहुल गांधी म्हणाले, आम्ही अदानींचे नव्हे शेतकरी, गरीब, बेरोजगारांचे सरकार चालवणार आहे. अग्निवीर ही लष्करातील नव्हे मोदींच्या डोक्यातील योजना आहे, आमचे सरकार आल्यावर आम्ही अग्निवीर योजना बंद करणार, आम्ही हरितक्रांती, दूधक्रांती, बँकांचे राष्ट्रीयीकरण करतो तर मोदी धर्मावर 24 तास बोलतात, असेही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे –
– पीएम मोदी यांनी देशामध्ये चेष्ठा लावलीय. कोरोनामध्ये हजारो माणसे मरत असताना थाळ्या, टाळ्या वाजवायला सांगितल्या.
– देशातील उद्योगपतींचे कर्ज माफ होत असतानाच शेतकऱ्यांचे का होत नाही? ज्या पद्धतीने आम्ही पहिली कर्जमाफी दिली त्या पद्धतीने कर्जमाफी देऊ.
– गेल्या 10 वर्षांत मोदीजी यांनी काही निवडक करोडपती उद्योगपती अदानी यांच्यासाठी सरकार चालवले. मोदीचं सरकार आलं तर अदानींचे शेअरचे भाव वाढतात, हे अदानीचं सरकार आहे.
– सीबीआय, ईडीचा दबाव आणून मुंबईचं विमानतळ अदानींकडे दिलं आहे.
– भारतातील सर्व पोर्ट यांच्या हातात आहेत.
– देशातील आज 22 असे लोकांकडे जेवढी संपत्ती आहे. तेवढीच संपत्ती या देशातील 70 टक्के लोकांकडे आहे.
– मोदी धर्म आणि हिंदू मुस्लीम यांच्यावर चर्चा करतात. जीएसटीच्या रुपाने तुमच्याकडील पैसे जातात. तुम्ही तेवढा कर देता, जेवढे गौतम अदानी देतात.
– पेपर लीकवर कडक शासन तयार केले जाईल. कोणतीही प्रायव्हेट कंपनी विद्यार्थ्यांची परीक्षा घेणार नाही. सरकारी नोकरी सरकारच्या अधिकाऱ्यामार्फत घेतली जाईल.
– आमचं सरकार आल्यावर जातनिहाय जनगणना करणार. प्रत्येक घरातील महिलेची निवड करून तिच्या खात्यात एक लाख रुपये टाकणार आहे. प्रत्येक महिलेच्या खात्यात 1 तारखेला साडे तास हजार म्हणजे वर्षाला 1 लाख रुपये दिले जातील.
– 22 लोकांना 16 लाख कोटी रुपये दिले आहेत. म्हणजे 24 वर्षाच्या मनरेगाचा जेवढा पैसा आहे. तेवढा पैसा उद्योगपतींना दिला. आम्ही लोकांना व गरजूंना मदत करु.
– नरेंद्र मोदी म्हणतात की, मी ओबीसी आहे. मग देशातील सर्वात मोठ्या संस्थांमध्ये किंवा प्रायव्हेट संस्थामध्ये ओबीसींचे प्रतिनिधीत्व किती आहे. देशाचे सरकार दिल्लीत बसून 90 अधिकार चालवतात.
– त्यात ओबीसी, मागासवर्गीयांचे प्रतिनिधीत्व किती आहे. 90 लोकांमध्ये तीन नाव ओबीसी, एक दलित, एक मुस्लिम बाकी सर्व लोक दुसरे आहेत. मग मोदी म्हणतात ओबीसी पण त्याचा फायदा काय? ओबीसींसाठी तुम्ही काय केले, कोणती योजना आणली ते आधी सांगा?
– मोदी 24 तास धर्मावर बोलून तेढ निर्माण करतात
– विमानतळच नाही तर देशातील पायाभूत सुविधामधील अदानींचा हिस्सा आहे.
– मी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चाललो. यात लोकांना मी विचारत होतो की, सर्वात महत्त्वाचा मुद्दा कोणता? तेव्हा लोक म्हणायचे की, बेरोजगारी, महागाई, शेतीमाल्याला भाव नाही हे विषय आहेत.
– पण हे गंभीर विषय कधीही टीव्हीवर दिसत नाहीत. मांडले जात नाहीत. तुम्हाला मोदी समुद्रात पूजा करताना दिसतील, तिथे पुजारी नाही तरीही पूजा करतात. तर विमानात बसून मजा मारली जाते. नरेद्र मोदी 24 तास धर्मावर बोलतात.
– जातीजातीमध्ये तेढ निर्माण करणारे विधान करतात.
– केवळ लोकांचे ध्यान भटकविण्यासाठी हे सर्व आहे. देशात केवळ थट्टा मांडली जात आहे.
दरम्यान, पूर्व विदर्भातील महाविकास आघाडीच्या लोकसभा उमेदवारांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची आज भंडाऱ्याच्या साकोलीत भव्य सभा पार पडली. तर उद्या 14 एप्रिलला याच ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील भव्य प्रचार सभा होत आहे. लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाचा नारळ हा पूर्व विदर्भापासून फुटणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विदर्भात येत्या 19 एप्रिल रोजी रामटेक, नागपूर, भंडारा -गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच जिल्ह्यामध्ये मतदान होणार आहे. तर निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहेत.