बिजापूर – छत्तिसगढमधील बिजापूर जिल्ह्यात पोलिसांच्या 25 खबऱ्यांची हत्या केल्याचा दावा नक्षलवाद्यांकडून करण्यात आला आहे. त्या दाव्यामुळे मोठी सनसनाटी निर्माण झाली आहे.
नक्षलवाद्यांचे एक पत्रक गुरूवारपासून सोशल मीडियावरून फिरत आहे. त्यामध्ये पोलिसांच्या खबऱ्यांना मृत्यूदंड ठोठावण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्या हत्यासत्राचा कालावधी नक्षलवाद्यांकडून नमूद करण्यात आलेला नाही.
पोलिसांनी एकप्रकारे हत्यासत्र घडल्याचे मान्य करताना त्या घटना दोन महिन्यांमधील असल्याची माहिती दिली आहे. मागील आठवड्यात नक्षलवाद्यांनी त्यांच्या पूर्वाश्रमीच्या 6 साथीदारांची गोळ्या घालून हत्या केली. त्यांचा उल्लेखही नक्षलवाद्यांनी खबरे म्हणून केल्याकडे पोलिसांनी लक्ष वेधले.
छत्तिसगढचा बस्तर विभाग नक्षलग्रस्त मानला जातो. त्या विभागात स्थानिक आदिवासींकडून नक्षलवाद्यांना पाठिंबा मिळत होता. मात्र, ते आदिवासी आता नक्षलवाद्यांच्या गैरकृत्यांना विटले आहेत. स्थानिकांचा पाठिंबा कमी होऊ लागल्याने नक्षलवादी अस्वस्थ झाले आहेत. त्यातून ते दहशत निर्माण करण्यासाठी निष्पाप आदिवासींना लक्ष्य करत आहेत, असे पोलिसांकडून नमूद करण्यात आले.