पुणे – बांधकाम व्यावसायिक राजेश हरीदार कानाबार (रा.घोरपडी) यांच्या खून प्रकरणातील आरोपींना बंडगार्डन पोलिसांनी 24 तासांत अटक केली आहे. बावधान येथील जागेच्या वादातूनच त्यांचा खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रत्यक्षात गोळी झाडणाऱ्या सराईत गुन्हेगारासह चौघांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे.
राहुल आनंदा कांबळे, रूपेश आनंदा कांबळे, गणेश ज्ञानेश्वर कुऱ्हे (रा.बावधान) व सराईत गुन्हेगार हसमुख जसवंतभाई पटेल (रा.सुखसागरनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी राजेश कानाबार यांचा चालक विश्वास दयानंद गंगावणे (वय 32, रा. येरवडा) याने फिर्याद दिली होती.
राजेश कानाबार यांचे बावधान बुद्रुक येथील जागेसंदर्भात राहुल, रुपेश आणि गणेश यांच्याबरोबर वाद सुरू होते. यासंदर्भात मार्च महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी सुरू होती. सोमवारी दुपारी ते त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. दुपारी पावणेदोनच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर पडून गाडीमध्ये बसत असतानाच त्यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली होती. यामध्ये उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी प्राथमिक संशयावरून राहुल, रुपेश आणि गणेश यांना ताब्यात घेतले होते, त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांनी हसमुख पटेल याला सुपारी देऊन हा खून केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार हसमुख पटेल याला ताब्यात घेण्यात आले. हसमुख पटेल हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर 2012 पासून खून, आर्म ऍक्ट आदी गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे करत आहेत.