नवी दिल्ली – उत्तरप्रदेशातील हाथरस प्रकरणाचे पडसाद देशाच्या राजधानीत उमटले. त्या प्रकरणाचा आणि प्रकरणाच्या हाताळणीवरून उत्तरप्रदेश सरकारचा निषेध करण्यासाठी सायंकाळच्या सुमारास शेकडों निदर्शक दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात जमले.
निदर्शनांसाठी प्रथम दिल्लीतील इंडिया गेट परिसराची निश्चिती करण्यात आली. मात्र, राजपथ परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याने जंतर-मंतर निदर्शनाचे ठिकाण बनले. मास्क परिधान करून अनेक सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, महिला आणि राजकीय नेते निदर्शनात सहभागी झाले.
निदर्शकांनी पीडितेला न्याय मिळवून देण्याची मागणी करताना उत्तरप्रदेश सरकारचा निषेध करणाऱ्या घोषणा दिल्या. त्या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणीही निदर्शकांकडून करण्यात आली.
हाथरस प्रकरणाची हाताळणी उत्तरप्रदेश सरकार आणि पोलीस चुकीच्या पद्धतीने करत आहेत. त्या राज्यात गुंडाराज सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.
प्रकाश कारत, सीताराम येचुरी या माकप नेत्यांबरोबरच वरिष्ठ वकील प्रशांत भूषण, स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव, आपचे आमदार सौरभ भारद्वाज, भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद, बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आदी निदर्शनात सहभागी झाले.