नांदेड : केंद्र सरकारने बहुमताने मंजूर करून घेतलेल्या कृषी आणि कामगार कायदा सुधारणा विधेयकांवरून सध्या देशभरात केंद्र सरकारविरोधात निषेध व्यक्त करून आवाज उठवला जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे काँग्रेस नेते मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपला ईस्ट इंडिया म्हणत भाजपवर जोरदार टीका केली आहे.
केंद्र सरकारच्या नवीन कृषी व कामगार कायद्यांच्या विरोधात असलेला प्रचंड असंतोष आज देशभरातील आंदोलनांच्या माध्यमातून दिसून आला. नांदेड येथेही काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधताना नांदेडमध्ये ते बोलल होते.
अशोक चव्हाण म्हणाले की, केंद्राने आणलेले नवीन कायदे कामगार आणि शेतकऱ्यांसाठी घातक आहेत. त्यामुळे होणारे नुकसान आज कळणार नाही, पुढे दिसून येईल.त्यामुळे महाराष्ट्राच्या पातळीवर शेतकरी व कामगारांच्या हितांचे संरक्षण करणारे कायदे करण्याची आमची भूमिका असून, तशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पुढे भाजपच्या कृषी आणि कामगार कायदा सुधारणा विधेयकांकर टीका करताना ते म्हणाले की, ब्रिटिशांच्या काळात ईस्ट इंडिया कंपनी होती. त्या कंपनीने देशाला लुटलं. सगळा मुद्देमाल तिकडे घेऊन गेले. आज भाजपच्या रूपाने तशीच नवीन ईस्ट इंडिया कंपनी सुरू झाली आहे. काही व्यापारी एकत्र आले आहेत आणि भाजपच्या माध्यमातून भारताला लुटायला लागले आहेत.