प्रियांका गांधी म्हणाल्या, आशेचा किरण निर्माण झाला
लखनौ – हाथरस येथील दलित मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाची माहिती सादर करण्यासाठी अलाहाबाद हायकोर्टाने राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव, राज्याचे पोलीस प्रमुख व अतिरिक्त पोलीस प्रमुखांना कोर्टापुढे हजर राहून या घटनेची माहिती सादर करण्याचा आदेश दिला आहे.
त्यासाठी त्यांनी 12 ऑक्टोबर रोजी हायकोर्टापुढे हजर राहावे असे समन्स जारी करण्यात आले आहेत. या निर्णयाचे कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी स्वागत केले असून हायकोर्टाच्या या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळण्याची थोडी तरी आशा निर्माण झाली आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
हायकोर्टाने या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली आहे. हाथरसचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनाही हायकोर्टाने समन्स जारी करून कोर्टापुढे हजर राहून या घटनेची माहिती सादर करण्याचा आदेश दिला आहे.
या पीडितेचा जबरदस्तीने अंत्यविधी उरकण्यात आल्याचा प्रकार धक्कादायक आहे त्यामुळेच आम्ही या घटनेची स्वतःहून नोंद घेऊन संबंधितांना कोर्टात पाचारण करण्याचा निर्णय घेत आहोत, अशी टिप्पणीही कोर्टाने केली आहे.
प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा दावा आणि प्रत्यक्ष पीडित कुटुंबीयांचा दावा यात फारकत आहे आणि प्रशासनाने या कुटुंबावर दबाव आणून त्यांना गप्प केले आहे, असे जे वारंवार सांगितले जात आहे त्याचीही खातरजमा हायकोर्टाने करण्याचे ठरवले असून पीडित मुलीच्या आईवडिलांनाही हायकोर्टात हजर करण्याचा आदेश त्यांनी प्रशासनाला दिला आहे. त्यांना येथे घेऊन येण्याची व्यवस्था पोलिसांनी करावी, असा आदेश कोर्टाने बजावला आहे.