मुंबई – सरकारच्या एका ताज्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये भारतात दर दिवशी सरासरी 79 खुनाची प्रकरणे, तर अपहरणासंबंधित घडणाऱ्या गुन्ह्यांपैकी 66 टक्के गुन्हे ही बालकांशी संबंधित आहेत.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार देशात महिलांवरील अत्याचारात वाढ झालेली दिसून आली आहे. 2019 साली महिलांसंबंधी 4,05,861 गुन्हे नोंदवण्यात आली होती. जी 2018 च्या तुलनेत 7 टक्क्यांनी जास्त असल्याचे दिसून आले. तर दरदिवशी बलात्काराच्या सरासरी 87 गुन्ह्यांची नोंद झाल्याची धक्कादायक माहिती या आकडेवारीतून उघडकीस आली आहे.
या नव्या आकडेवारीतून 2019 साली एकूण 32,033 गुन्हे बलात्कारासंबंधी नोंद झाली आहेत. यात राजस्थान प्रथम तर उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत अपहरणाच्या गुन्ह्यात 0.7 टक्के घसरण झाली असून एकूण प्रकरणात 78.6 टक्के पीडित या महिला व मुली आहेत. 2019 साली एकूण 1,05,037 गुन्हे नोंद झाली असून 1,08,734 पीडितांची संख्या आहे. 2018 साली गुन्ह्यांची संख्या 1,05,734 इतकी होती, अशी ही आकडेवारी सांगते.
2019 साली अपहरण पीडितांपैकी 23,104 हे पुरुष होते तर 84,921 या महिला होत्या. एकुणापैकी 71,264 पीडित ही लहान मुले होती तर प्रौढांची संख्या ही 36,761 इतकी होती. 96,295 अपहरण पीडितांपैकी ( 22,794 पुरुष आणि 73,501 महिला) 95,551 पीडितांना वाचवण्यात यश आले अशी ही आकडेवारी सांगते.
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती विरोधातील गुन्ह्यांत 2018 च्या तुलनेत अनुक्रमे 7 टक्के आणि 26 टक्के वाढ झाली आहे.
दरम्यान, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो ही केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी संस्था आहे. ती देशांतर्गत विशेष आणि स्थानिक कायद्यांच्या आधारे देशातील गुन्ह्यांची माहिती एकत्रित करते आणि त्याचे विश्लेषण करते.