महाबळेश्वर -निसर्गसौंदर्याने नटलेले व सह्याद्रीच्या गिरीशिखरावर वसलेले महाबळेश्वर महाराष्ट्राचे “नंदनवन’ म्हणून ओळखले जाते. या जगप्रसिद्ध पर्यटनस्थळी पंधरा ते वीस लाख पर्यटक दरवर्षी भेट देतात; परंतु आतापर्यंत महाबळेश्वरला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाला नव्हता. त्यासाठी नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून राज्य शासनाने महाबळेश्वर पालिका क्षेत्रास विशेष बाब”म्हणून “ब’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा नुकताच दिला आहे.
महाबळेश्वर हे तीर्थक्षेत्र म्हणून रकालांतराने ब्रिटिश आमदनीत या शहराचा चेहरामोहरा बदलून गेला. सर जॉन माल्कम या अधिकाऱ्याच्या नावाने महाबळेश्वर येथे बाजारपेट वसवली गेली. 1918 मध्ये इंग्रजांनी आपल्या सैनिकांसाठी सरकारी दवाखाना व अधिकाऱ्यांसाठी विश्रामगृहे बांधली. इंग्रजांनी चिनी कैद्यांना महाबळेश्वरला आणून त्यांच्याकडून रस्ते, घरे, बंगले बांधून घेतले होते. त्यानंतर महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरी, राजबेरी, मलबेरी व इतर फळांच्या शेतीस सुरुवात झाली. हळूहळू महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ
म्हणून नावारूपास आले. महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिकेची स्थापना 1864 साली झाली. त्यानंतर येथे पर्यटकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध झाल्या असून स्थानिकांनी तयार केलेल्या हस्तकलेच्या वस्तू, कातडी चप्पलांना बाजारपेठ मिळाली. नौकाविहारसाठी प्रसिद्ध असलेला वेण्णा लेक पर्यटन हंगामात गर्दीने ओसंडून वाहतो; परंतु महाबळेश्वरला आतापर्यंत पर्यटन स्थळाचा अधिकृत दर्जा मिळाला नव्हता. नगराध्यक्ष स्वप्नाली शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरास पर्यटन स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
शासनास 2018 मध्ये याबाबतचा प्रस्ताव पाठवून सलग दोन वर्ष पाठपुरावा केला. नगरपरिषदेकडून 13 जुलै 2019 रोजी “ब”वर्ग पर्यटन स्थळाच्या दर्जाबाबत परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यानंतर शासनाच्या मंजुरीसाठी सर्व निकषांची पूर्तता करण्यात आली. या प्रस्तावाच्या मान्यतेसाठी स्वप्नाली शिंदे व त्यांचे पती, नगरसेवक कुमार शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. महाबळेश्वरवर विशेष प्रेम असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे फेब्रुवारीमध्ये सहकुटुंब महाबळेश्वरला खासगी दौऱ्यावर आले असता, त्यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये बैठक घेतली होती. त्या बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाई व विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाबळेश्वरची पर्यटनस्थळ म्हणून देशात वेगळी ओळख असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या बैठकीत महाबळेश्वर पालिकेच्यावतीने व जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सादरीकरण करून ेमहाबळेश्वरला “ब’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून मान्यता देण्याची मागणी केली होती.
या प्रस्तावावर विशेष बाब म्हणून कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मार्चमध्ये राज्याच्या अर्थसंकल्पात महाबळेश्वर, पाचगणीच्या विकासासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर महाबळेश्वर पालिकेस 28 सप्टेंबर रोजी मिळालेल्या शासन निर्णय टीडीएस 2016/11/प्र.क्र.862/पर्यटन, दि.25.4.2017 अन्वये महाबळेश्वरला “ब’ वर्ग पर्यटनस्थळ म्हणून मान्यता देण्यात येत असल्याचे म्हटले आहे.