रमेश जाधव
रांजणी – राज्यात लाखो टन साखर शिल्लक असताना येत्या गाळप हंगामात सुमारे शंभर लाख टन नवीन साखर तयार होण्याची शक्यता आहे. राज्यात अभूतपूर्व साखर साठ्याची समस्या सोडवण्यासाठी यंदा उत्पादन किमान वीस लाख टनाने घटवण्याचे नियोजन साखर संघाने केले आहे.
यंदा ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. चांगल्या मान्सूनमुळे यंदा ऊस उत्पादनात आधीच्या अंदाजापेक्षा 80 ते 90 लाख टनाने वाढ होणार आहे. आधीचा अंदाज 815 लाख टनाचा होता, तो यंदा 890 लाख टनांच्या पुढे जाईल. उसाची उत्पादकता देखील हेक्टरी 75 ते 80 टनांवरून 90च्या आसपास राहू शकते. साखर उद्योगात सध्या आढावा बैठका सुरू आहेत.
कारण ऊस उपलब्धता आणि साखरसाठा जास्त असल्याने गाळपाचे नियोजन पारंपरिक पद्धतीने झाल्यास मोठे आर्थिक संकट उभे राहील, अशी भीती साखर कारखान्यांना वाटते आहे. कारण आधीच्या 72 लाख टनाच्या शिल्लक साठ्यात नव्या हंगामातील 101 लाख टन साखरेची भर पडू शकते. यातून सर्व आर्थिक नियोजन विस्कळीत होऊ शकते, असे साखर संघातील जाणकारांना वाटते.
सहकार यंत्रणेला गाफील राहून चालणार नाही
2019-20 च्या हंगामात ऊस गाळपाला 545 लाख टन ऊस होता. त्यातून 61 लाख टन साखर तयार झाली. गेल्या वर्षी 147 साखर कारखाने सुरू होते. चालू वर्षाच्या हंगामाची स्थिती मात्र 2018-19 च्या हंगामासारखी आहे. 2018 मध्ये राज्यात 952 लाख टन ऊस होता, यातून 102 सहकारी आणि 93 खासगी कारखान्यांनी 107 लाख टन साखर तयार झाली होती.
चांगल्या पावसामुळे यंदा गाळप 900 लाख टनांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे किमान 195 कारखाने सुरू करावे लागतील. साखर कारखान्यांना तातडीने पूर्वहंगामी कर्ज द्यावे लागेल, यंदा सहकार यंत्रणेला गाफील राहून चालणार नाही. साखर संघाचे प्रयत्न तर सुरू आहे; परंतु बॅंका अर्थखाते सहकार विभागाला झटून काम करावे लागेल, असे मत साखर उद्योगातून व्यक्त करण्यात येते.
यंदा चांगला पाऊस पडल्याने पाण्याच्या उपलब्धतेमुळे उसाचे टनेज जादा मिळण्याची शक्यता आहे. पुणे विभागात यंदा उसाचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र असल्यान साखरेची उपलब्धता देखील पुणे विभागामध्ये जास्त होईल.
-बाळासाहेब बेंडे,
अध्यक्ष, भीमाशंकर सहकार साखर कारखाना, पारगाव
भरमसाठ साखर निर्मितीमुळे साखर कारखान्यांसमोर यंदा आर्थिक संकट तयार होऊ शकते. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कारखान्यांना यंदा साखर उत्पादन घटविण्यासाठी मिशन मोडवर काम करावे लागेल. -संजय खताळ,
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य साखर संघ