सातारा -कोविडच्या वाढत्या प्रसारामुळे कास पठारावर पर्यटन सुरू करण्याची जिल्हा प्रशासनाची मानसिकता दिसत नाही. त्यामुळे कास पठारावर बहरणारे पुष्प सौंदर्य पर्यटकांसाठी खुले होण्याची शक्यता धूसर आहे; परंतु लॉकडाऊनमधील पर्यटनबंदीचा कासच्या व एकूणच पश्चिम घाटाच्या पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होईल, असे मत कोल्हापूरचे ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक डॉ. मधुकर बाचूळकर यांनी व्यक्त केले.
जागतिक निसर्ग वारसा स्थळाचा दर्जा लाभलेल्या कास पठारावरील रानफुलांच्या मोसमाला सुरुवात झाली आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर पडलेल्या उन्हामुळे कास पठारावर जगातील अलौकिक रानफुले उगवायला सुरुवात होते. कासकडे जाताना वाटेत यवतेश्वरपासून पुढे रस्त्याच्या दुतर्फा पिवळ्या रंगाची छोटी सोनकीची फुले पर्यटकांचे स्वागत करतात.
पठारावर पोहोचल्यानंतर तेरड्याच्या फुलांचा जागोजागी सडाच पडलेला दिसतो. त्याशिवाय विविधरंगी रानफुलांचा बहर दिसतो. यंदा फुलांच्या रंगोत्सवाला सुरुवात झाली असली तरी पर्यटनावर कोविडचे सावट आहे. साधारणत: 1 सप्टेंबरला कासचा पर्यटन हंगाम वन विभागाच्या अखत्यारीतील कास कार्यकारी समिती सुरू करते. कोविडचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने कासवरील पर्यटनाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. कास पठारावरील पायवाटा, कुमुदिनी तळ्याकडे जाणारा राजमार्ग पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यांच्या लॉकडाऊनला कंटाळलेले पर्यटक पठारावर तुरळक प्रमाणात “वीकएंड’ला येत असले तरी दुरुनच फुलांचे दर्शन घेऊन परतावे लागत असल्याने त्यांचा भ्रमनिरास होत आहे.
दैनिक “प्रभात’च्या प्रतिनिधीने प्रशासनाच्या हालचालींचा कानोसा घेण्याचा प्रयत्न केला असता, जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानुसार कार्यवाही केली जाईल, असे वन विभागातून सांगण्यात आले. कास पठार पर्यटनासाठी खुले करण्यासंदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. यंदा कास पठारावर पर्यटकांना प्रवेशबंदीच राहण्याची शक्यता असल्याचे प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.