सातारा -जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांची तडकाफडकी बदली झाली असून त्यांच्या जागी नंदूरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शासनाने गुरुवारी काढले आहे. जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा सुरु असतानाच संजय भागवत यांची अचानक बदली झाल्याने खळबळ उडाली. भागवत यांना अद्याप कोणतीही नियुक्ती देण्यात आली नाही. विनय गौडा उद्या (दि.25) पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
संजय भागवत यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची सुत्रे दि. 18 जुलै 2019 रोजी स्वीकारली होती. भागवत टेक्नोसॅव्ही असल्याने सर्वच विभागांच्या ऑनलाइन कामकाजावर त्यांचा भर होता. पेपरलेस कार्यालय करण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती.
करोना संकटाच्या काळातही त्यांनी आरोग्य विभागात ठिय्या मांडून नियमित जिल्ह्याचा आढावा ते घेत होते. डिसेंबर महिन्यात भागवत सेवानिवृत्त होणार होते. अचानक भागवत यांची बदली झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.
नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा 2015 च्या “आयएएस’ बॅचचे अधिकारी आहेत. गौडा यांच्या प्रशासकीय अधिकारी सेवेची सुरवात नंदुरबारला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाली. त्यानंतर नंदूरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. गुरुवारी त्यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली. दरम्यान विनय गौडा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.
संजय भागवत अनुभवी अधिकारी होते. डिसेंबर महिन्यात ते सेवानिवृत्त होणार आहेत. पदाधिकारी, अधिकाऱ्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. अध्यक्ष असलो तरी काहीही काम असले तरी मी त्यांच्या दालनात जाऊन चर्चा करत होतो. करोनाच्या काळातही त्यांनी चांगले काम केले. त्यांची झालेली बदली झाली ही प्रशासकीय बाब असून कोणत्याही पदाधिकाऱ्यांची त्यांच्याबाबत तक्रार नव्हती.
– उदय कबुले (अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा)