गोकुळ टांकसाळे
भवानीनगर – येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यात गेल्या 17 वर्षांत संचालक मंडळाला धारेवर धरत साखर संघाचे माजी अध्यक्ष, अभ्यासू नेते पृथ्वीराज जाचक यांनी राष्ट्रवादीला बॅकफूटवर आणले होते. श्री छत्रपती कारखान्यातून राजकीय कारकिर्दीची सुरूवात करणाऱ्या अजित पवार यांनी जाचक यांना कारखान्याची धुरा सांभाळण्याचे आदेश देऊन समेट घडवून आणला आहे. कारखान्याच्या शिवारातील पवार- जाचक यांच्या संघर्षाला खऱ्या अर्थाने मूठमाती मिळाली आहे. दरम्यान, सहकारातील अभ्यासू नेता राष्ट्रवादीच्या छावणीत दाखल झाल्याने उसाच्या फडातील नाट्यमय घडामोडीनंतर भाजप अस्थवस्थ झाला आहे.
भवानीनगर येथे श्री छत्रपती साखर कारखान्याचे भूमिपूजन 13 मे 1956 साली कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या हस्ते झाले. तेव्हापासून परिसरातील गावांचा खऱ्या अर्थाने विकास सुरू झाला. कारखाना उभारणीमध्ये कै. साहेबराव जाचक, कुरवली गावचे कै. केरबा कदम, लासुर्णेचे कै. गोविंदराव पाटील, सणसरचे कै. भिकुलाल नाना निंबाळकर, कै. मारुतराव यादव, कै. बापूराव गावडे आदींनी शेतकरी हितासाठी निस्वार्थी भावनेने काम केले आहे.
जाचक यांनी शरद पवार यांच्याविरोधात तसेच श्री छत्रपती कारखान्यामधील लेखाजोखा मांडून व्यवस्थापनाला जेरीस आणले होते. त्यामुळे त्यांनी राज्याच्या सहकारात दबदबा निर्माण केला आहे. कारखान्यातील विस्कटलेल्या अर्थकारणावर सडेतोड, मुद्देसूद भाष्य केले आहे. पाच वर्षांत त्यांनी कारखान्यातील गैरकारभारावर ताशेरे ओढत संचालक मंडळाला खिंडीत पकडले. कारखान्याचा आर्थिक गाडा रुळावरून घसरत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. हाच मुद्दा ऊस उत्पादकांना भावला.
कारखान्याचा ताळेबंद कमकुवत होत असल्याचे सांगून त्यांनी ऊस उत्पादकांसाठी पवार कुटुंबासाठी संघर्ष केला. यातून दूरगामी पडसाद उमटले. कारखान्याची धुरा सक्षमपणे हाताळू शकणारी व्यक्ती नसल्यामुळे जाचक यांनाच आमंत्रण दिले. गेल्या चार महिन्यांपासून जाचक हे राष्ट्रवादीत जाणार, अशी चर्चा होती. शरद पवार, अजित पवार यांनी जाचक यांच्याकडे कारखान्याची सूत्रे देण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कारखान्यातील अधिकाऱ्यांच्या निवडीसाठी जाचक यांना निमंत्रित केल्यामुळे चर्चेला पूर्णविराम मिळाला. अजित पवार यांनी जाचक यांच्या विश्वासार्हतेची मोहोर उमटविल्यामुळे कारखान्याची घडी बसवून 26 हजार ऊस उत्पादकांना न्याय देतील, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
सहकारातील पडसाद शमविले
2003 मध्ये जाचक हे पवार कुटुंबापासून तात्विक मतभेदातून दूर गेले. त्यांनी 2004 मध्ये शरद पवार यांच्याविरुद्ध लोकसभेची निवडणूक लढविली. त्यानंतर पवार आणि जाचक यांच्यात वाद सुरू झाला. दरम्यानच्या सतरा वर्षांत कारखान्याच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. जाचक हे एकाकी लढत देत होते.
मात्र, त्यांना यश आले नाही. यातच कारखान्याची आर्थिक वाताहत होऊ लागल्याने अर्थकारण जाणणाऱ्या अभ्यासू नेत्याची गरज भासू लागली. कार्यक्षेत्रातील सभासदांचे राजकीय आखाड्यात पडसाद उमटू नयेत, यासाठी जाचक यांच्याकडे सुत्रे सोपवून ऊस उत्पादकांचे भविष्यातील पडसाद शमविले आहेत. यात बारामती नगर परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पुढील काळात कारखान्याची निवडणूक जाचक यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाण्याची चर्चा जोर धरत आहे.
लोकसभा कार्यक्षेत्रातील भाजप बेचैन
बारामती लोकसभा मतदारसंघात 2014 पासून भाजपने चांगलीच मशागत केली आहे. इंदापूर, दौंड हे दोन तालुके सहकार टापूत येतात. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपच्या गोटात सामील झाले. पाटील यांचा सहकारातील गाढा अभ्यास, त्याला अप्रत्यक्षपणे जाचकांची मिळालेली जोड, हे भाजपसाठी जमेच्या बाजू असताना कार्यक्षेत्रात राजकारणाला कलाटणी मिळाली आहे.
भाजपने 2019 मधील लोकसभा निवडणुकीत सहकार पट्टा धगधगता ठेवला होता. जाचक हे भाजपसाठी सहकारातील चलनी नाणे होते. त्यात अजित पवार यांनी जाचक यांचा विजनवास संपवून कारखान्यात एंट्री दिल्याने भाजप बेचैन झाला आहे.