जालना – ठाकरे सरकारने योग्य भूमिका न घेतल्याने मराठा समाजाला आरक्षणासाठी पुन्हा आंदोलन करावे लागत आहे. पण ठाकरे सरकारमुळेच मराठा समाजावर ही वेळ आली आहे. मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली हे या सरकारचे अपयश आहे. सरकारने योग्य पद्धतीने बाजू मांडली नाही त्यामुळे स्थगिती मिळाली, असा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे केला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. दानवे म्हणाले, तामिळनाडू सरकारने 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने तेथील आरक्षणाचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात गेला. सुप्रीम कोर्टाने त्यांचं आरक्षण प्रकरण पूर्ण पीठाकडे पाठवले.
दुसऱ्या बाजूला ठाकरे सरकारने आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर भक्कमपणे बाजू मांडण्याची गरज होती. ते केले गेले नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली, असा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
दोन्ही राज्यांची तुलना केली तर तामिळनाडूचे सरकार यशस्वी ठरले आणि ठाकरे सरकार आरक्षणाच्या मुद्यावर अपयशी ठरत आहे. ही स्थगिती उठवण्यासाठी ठाकरे सरकारने पूर्ण प्रयत्न केले पाहिजेत, असे झाले तरच मराठा समाज शांत होईल अन्यथा ठाकरे सरकारला या सगळ्याचे परिणाम भोगावे लागतील, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.