मुंबई – प्राप्तीकर विभागाकडून आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नोटीस बजावण्यात आली. पवार यांनी स्वतः ही माहिती पत्रकारांशी बोलताना सांगितली. निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्राशी संबंधित काही बाबींबाबत प्राप्तीकर विभागाने आपल्याला स्पष्टिकरण मागितले असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
‘ही नोटीस मिळाली. सर्व सदस्यांपेक्षा केंद्र सरकारचे आपल्यावर अधिक प्रेम आहे. निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनेनुसार प्राप्तीकर विभागाने ही नोटीस बजावली आहे. या नोटीसीला उत्तर दिले जाईल,’ असे पवार यांनी सांगितले.
खासदार सुप्रिया सुळे, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनाही प्राप्तीकर विभागाकडून अशीच नोटीस बजावण्यात आली आहे. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना पवार यांनी ही माहिती दिली आहे.
राष्ट्रपती राजवटीचे प्रयत्न कशासाठी ?
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचालींवरही पवार यांनी प्रकाश टाकला. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू काण्याचे काही कारण आहे का ? राष्ट्रपती राजवट म्हणजे काही विनोद आहे का ? महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला विधानसभेमध्ये पूर्ण बहुमत आहे असे त्यांनी सांगितले. कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली.