पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता बारावीसाठी पुनर्रचित अभ्यासक्रम व नवीन पाठ्यपुस्तकांची अंमलबजावणी सुरू केली आहे. याबरोबर सुधारित मूल्यमापन आराखडाही तयार केला असून त्याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे.
बारावी अभ्यासक्रम बदलला आहे. त्यामुळे मूल्यमापनासाठीही नवी पद्धत वापरण्यात येणार आहे. कला, वाणिज्य शाखेसाठी 80/20, तर विज्ञान शाखेसाठी 70/30 याप्रमाणे गुणांचा पॅटर्न कायम ठेवला आहेत. तोंडी परीक्षेऐवजी ऍक्टिव्हिटी शीटच्या माध्यमातून अंतर्गत मूल्यमापनाचे गुण देण्यात येणार आहेत.
भाषेत्तर गटातील इतिहास, भूशास्त्र, राज्यशास्त्र, बालविकास, वस्त्रशास्त्र, तर्कशास्त्र, अर्थशास्त्र, पुस्तपालन व लेखाकर्म, व्यापार संघटन, चिटणासांची कार्यपद्धती, सहकार, कृषीविज्ञान, माहिती तंत्रज्ञान-कला, वाणिज्य, विज्ञान, शिक्षणशास्त्र, पर्यावरण व जलसुरक्षा या विषयांच्या सुधारित मूल्यामापन योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात येणार आहे. घटकनिहाय गुणविभागणी, अंतर्गत मूल्यमापन योजना यास शासनाने मान्यता दिली.
प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यातही बदल करण्यात येणार आहे. एक, पाच, दहा गुणांच्या प्रश्नांऐवजी एक, दोन, तीन, चार, पाच गुणांचे प्रश्न आता विचारले जाणार आहेत. 25 टक्के प्रश्न हे वस्तुनिष्ठ स्वरुपाचे असणार आहेत. पर्यावरणाच्या विषयासाठी 50 गुणांऐवजी श्रेणी देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता एकूण 650 ऐवजी 600 गुणांपैकीच विषयनिहाय गुण मिळणार आहेत.