पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्यात लावण्याच्या दृष्टीने राज्य मंडळाने तयारी सुरू केली आहे. दरवर्षी बारावीचा निकाल जूनच्या शेवटच्या आठवड्यात तर दहावीचा निकाल जुलैच्या पहिल्या-दुसर् या आठवड्यात लागत असतो. यंदा मात्र हे निकाल लवकर लावण्याच्या हालचाली आहेत.
राज्यातील नऊ विभागीय मंडळामार्फत दहावीची परीक्षा १ ते २६ मार्च तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत झाली. या परीक्षांच्या कालावधीतच संबंधित विषयाची परीक्षा होत गेल्या त्यानुसार तात्काळ पेपर तपासणीचे काम सुरु करण्यात आले होते. पेपर तपासणी झाल्यानंतर त्या त्या विषयाच्या उत्तरपत्रिकाही संकलन केंद्रावर जमा करण्यासाठी ठराविक मुदतही देण्यात आली होती. आता उत्तरपत्रिकाही संकलनाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. उत्तरपत्रिका जमा करण्यासाठीही व्यवस्था करण्यात आलेली आहे.
प्रत्येक वर्षी शिक्षक उत्तरपत्रिका तपासणीवर तर शिक्षकेत्तर कर्मचारी परीक्षेच्या कामकाजावर बहिष्कार टाकतात. यावर्षी मात्र तसे काहीच झाले नाही. त्यामुळे परीक्षा सुरळीतपणे पार पडल्या.
बारावीचा निकाल मे महिन्याच्या तिसर् या आठवडयात तर दहावीचा निकाल चौथ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकांचे निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहेत. त्यापुर्वीच दहावी, बारावीच्या परीक्षांचे निकाल लावण्याच्या अनुषंगाने राज्य मंडळाने प्रयत्न सुरु ठेवलेले आहेत.