खासगी कंपन्यांकडून समृद्धी निर्मितीत मोठी वाढ
मुंबई – गेल्या 7 वर्षांत खासगी कंपन्या बाजार मूल्यात आघाडीवर आहेत. या काळात शेअरबाजार निर्देशांकही वाढले आहेत. मात्र, या परिस्थितीत सरकारी कंपन्या समृद्धी निर्मितीत मागे पडल्याची आकडेवारी समोर आली आहे.
यासंदर्भात काही म्युच्युअल फंड घराण्यांनी आकडेवारी संकलित केली आहे. नागरिकांना आणि खासगी कंपन्यांना सरकार कर भरण्यासाठी आग्रह करते. मात्र, या काळात सरकारी कंपन्यांनी फारशी प्रगती केलेली नाही. विशेष म्हणजे सरकारी कंपन्यांची उद्योग क्षेत्रे ही त्यांच्यासाठी राखीव ठेवलेली आहेत. तरीही त्यांच्याकडून महसूल आणि उलाढालीत वाढ झालेली नाही. 2009 पासून सरकारी कंपन्यांच्या शेअरबाजाराचे निर्देशांक आहेत, त्याच पातळीवर स्थिर आहेत. तर इतर कंपन्यांच्या शेअरचे भाव जवळजवळ पाच पटीने वाढले आहेत, असे स्टेट बॅंक म्युच्युअल फंडाचे कार्यपालन अधिकारी नवनीत मुनोत यांनी सांगितले.
या कंपन्यात सरकारकडून गुंतवणूक करण्यात आली आहे. ही गुंतवणूक जनतेच्या पैशातून झाली आहे. हा पैसा उत्पादक होत नाही, याबद्दल कोटक म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश शहा यांनी खेद व्यक्त केला. ही गुंतवणूक अनुत्पादक होत आहे. सरकारने सरकारी कंपन्यांची निर्गुंतवणूक करण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली आहे. यावर्षी केंद्र सरकारने 2.1 लाख कोटींची निर्गुंतवणूक करण्याचे ठरवले होते. मात्र, त्याला अद्यापपर्यंत फारसे यश आलेले नाही. दरम्यानच्या काळात करोना व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे शेअरबाजाराचे निर्देशांक अस्थिर झाले होते.
एकेकाळी एमटीएनएल रिलायन्सपेक्षा होती मोठी
एक वेळ महानगर टेलिफोन निगम लिमिटेड या कंपनीचे बाजारमूल्य रिलायन्स इंडस्ट्रीजपेक्षा जास्त होते. मात्र, दरम्यानच्या काळामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज कितीतरी पुढे गेली आहे. आता सर्व सरकारी कंपन्यांच्या बाजारमूल्यापेक्षा रिलायन्स कंपनीचे बाजारमूल्य जास्त आहे. सरकारी कंपन्यांतील सरकारच्या गुंतवणुकीमुळे देशात मोठ्या प्रमाणात भांडवल निरुपयोगी होते. त्याचबरोबर त्याचा एकूण अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होतो.