पालघर – पालघरला भूकंपाचे सौम्य स्वरूपाचे आठ धक्के चार तासांत बसल्याची नोंद झाली आहे. हे धक्के 2.2 ते 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचे होते.
आज पहाटेच्या सुमाराला चार तासांच्या अवधीत हा प्रकार घडला आहे. या जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी या दोन तालुक्यांमध्ये ते जाणवले. तथापि, यात जीवितहानी झाल्याचे अजून वृत्त नाही.
पहिला धक्का अगदी पहाटे 3 वाजून 29 मिनिटांनी जाणवला. तो 3.5 रिश्टर स्केल क्षमतेचा होता. त्यानंतर 3 वाजून 57 मिनिटांनी 3.5 आणि 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचे लागोपाठ दोन धक्के बसले. पहाटे तीन ते सकाळी सात या चार तासांच्या अवधीत हे धक्के जाणवले.
जिल्ह्याचे आपत्ती नियंत्रण सेलचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी सांगितले की, संबंधित तालुक्यांच्या तहसीलदारांना प्रत्यक्ष जागेवर जाऊन कोठे नुकसान झाले किंवा कसे याची पहाणी करण्यास सांगण्यात आले आहे. पालघर जिल्ह्याला गेल्या आठवड्यापासून अशा स्वरूपाचे हलके भूकंपाचे धक्के वारंवार बसत आहेत.