साताऱ्यात बाप्पाला भावपूर्ण निरोप
सातारा (प्रतिनिधी) – करोनामुळे यावर्षी उत्सव जल्लोषात साजरा करता आला नाही; परंतु पुढच्या वर्षी सगळी उणीव भरून काढू. हे विघ्नहर्त्या, करोनासह सगळी विघ्ने दूर कर, असे साकडे घालत सातारकरांनी आपल्या लाडक्या गणपतीबाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. ना ढोल-ताशे, ना डीजेंचा दणदणाट, ना फटाक्यांची आतषबाजी, अशा अत्यंत साध्या, पण भक्तिभावाने भारलेल्या वातावरणात अनंत चतुर्दशीला सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. आटोपशीर विसर्जन मिरवणुकांमध्ये केवळ “गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर’चा गजर ऐकू येत होता. शहरातील मानाच्या व शेवटच्या शंकर-पार्वती गणेशमूर्तीचे विसर्जन मंगळवारी (दि. 1) रात्री नऊ वाजता करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगमुळे विसर्जन तळ्यावर भक्त व कार्यकर्त्यांची तुरळक उपस्थिती होती.
गणेशोत्सवाची चाहूल लागताच भक्तांच्या आनंदाला उधाण येते. सार्वजनिक मंडळे देखावे, आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई करतात. घरोघरी बाप्पांचे जल्लोषात स्वागत केले जाते; परंतु यंदा करोनाचे सावट असल्याने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन प्रशासनाने केले होते. या आवाहनाला सातारकरांनी भरभरून प्रतिसाद देत शांततेत व सर्व नियम पाळून यंदाचा उत्सव साजरा केला. दीड, पाच, सात व दहा दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर मंगळवारी अनंत चतुर्दशीला 11 दिवसांच्या बाप्पांना सातारकरांनी भक्तिभावाने निरोप दिला. सातारा पालिकेने विसर्जनासाठी पुरेशी व्यवस्था केली होती. शहरात ठिकठिकाणी जलकुंड व निर्माल्यकलश ठेवण्यात आले होते.
बुधवार नाका, हुतात्मा स्मारक, गोडोली, दगडी शाळा येथे कृत्रिम तलाव तयार केले होते. या तळ्यांमध्ये सातारकरांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले. सार्वजनिक मंडळांसाठी बुधवार नाक्यावर मोठ्या तळ्यात विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. तेथे 45 मंडळांच्या मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. यंदाही विसर्जनासाठी शंभर टनी क्रेन पुण्याहून मागविण्यात आली होती. दरवर्षी विसर्जन मिरवणुका दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजेपर्यंत चालायचा; परंतु यंदा करोनाने उत्सवाचे स्वरूपच बदलून गेले. मिरवणूक, डीजे, ढोल-ताशांचा गजर असा डामडौल न करता रात्री नऊ वाजेपर्यंत सर्व मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन झाले. मानाच्या शंकर-पार्वती गणेशमूर्तीचे सर्वात शेवटी विसर्जन झाले.