नवी दिल्ली – बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुका लांबणीवर टाकण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळली. करोना संकट हा निवडणुका पुढे ढकलण्यासाठीचा आधार नव्हे, असे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे बिहारमधील रणधुमाळीचा मार्ग मोकळा होणार आहे.
वेळापत्रकानुसार बिहारमध्ये ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका अपेक्षित आहेत. मात्र, देशातील बहुतांश राज्यांप्रमाणे बिहारलाही करोना संकटाने ग्रासले आहे. त्यातून आगामी निवडणुका लांबणीवर टाकण्याची मागणी विविध स्तरांतून होत आहे.
अशातच एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. बिहार राज्य करोनामुक्त बनेपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात. निवडणुकांपेक्षा मानवी जीवन महत्वाचे आहे. असाधारण स्थितीत निवडणुका लांबणीवर टाकण्याची तरतूद लोकप्रतिनिधित्व कायद्यात आहे. त्यामुळे तसा आदेश निवडणूक आयोगाला दिला जावा, अशी मागणी याचिकेतून करण्यात आली.
त्यावर अजूनपर्यंत निवडणुका घेण्यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली नसल्याकडे न्यायालयाने लक्ष वेधले. निवडणुका घेऊ नका असे आम्ही आयोगाला कसे काय सांगू शकतो? आयोग प्रत्येक बाब विचारात घेईल, असे म्हणत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.