राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे आमदारांना पत्र; लोकशाही मुल्यांचा आदर करण्याचे आवाहन
जयपूर: लोकशाही वाचवण्यासाठी, जनतेचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आणि चुकीच्या प्रथा टाळण्यासाठी आपण रयतेचा आवाज ऐकला पाहिजे. तुम्ही कोणत्या पक्षाचे असा, आपल्या मतदार संघातील जनतेच्या भावना समजून घ्या, कुटुंबीय आणि हितचितचिंतकांची मते लक्षात घ्या, त्यानंतर तुम्ही घेतलेला निर्णय लोकनियुक्त सरकार अस्थीर करण्याचा कट यशस्वी होऊ देणार नाही, असा विश्वास राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी व्यक्त केला.
सर्वपक्षीय आमदारांना पत्र पाठवून गेलहोत यांनी आपली भूमिका मांडली आहे. 2019मध्ये सरकार सत्तेवर आल्यापासून केलेल्या कामाचा गौरव करीत ते म्हणाले, राज्य आर्थिकदृष्ट्या स्थीर करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सरकारने करोनाच्या लढाही यशस्वीपणे हाताळला. करोनाला रोखण्यासाठी राजकीय गट, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, पोलिस, डॉक्टर, संत आणि विचारवंतासोबत बैठक घेतल्या, असे त्यांनी स्पष्ट केले.
आमदारांच्या पाठींब्यावर करोनावर नियंत्रण मिळवत असतानाच अशी परिस्थिती आली आहे की हे थांबवावे लागतेय की काय याची भीती वाटू लागली आहे. राजस्थानात बाधितांची संख्या वाढत आहे. रोज सुमारे 40 हजार चाचण्या घेतल्या जात आहेत. अन्य राज्यांच्या तुलनेत राजस्थानचा मृत्यू दर कमी आहे आणि बरे होणाऱ्यांचा दर अधिक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
सध्या करोनाची चिंता सर्वांनाच भेडसावत असतानाच आमचे काही सहकारी आणि काही विरोधी पक्षातील नेते यांनी सरकार अस्थीर करण्याचा कट रचला आहे. हे दुर्देवी आहे, असे ते म्हणाले. 1993 ते 96 या काळात घोडेबाजार होऊन भैरवसिंह शेखावत सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी मी केंद्रीय मंत्री आणि पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्यपाल बळीराम भगत आणि पंतप्रधान नरसिंह राव यांची भेट घेतली. यास विरोध केला कारण हे लोकशाही मुल्यांच्या विरोधात होते आणि मला वाटत होते ते राजकीय पाप आहे.
राजीव गांधी यांच्या कारकिर्दीत 1984 मध्ये पक्षांतर बंदी कायदा आणला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात दोन तृतीयांश सदस्यांच्या पक्षांतराला मान्यता देण्यात आली. त्यावेळी राजकीय अपरिहार्यता म्हणून सहा बसप आमदारांना सामावून घेण्यास (जे कायदेशीर होते) मी विरोध केला होता. कारण ते लोकशाही तत्वाच्या विरोधात होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
लोखशाही मुल्ये जपली
हार अथवा जीत ही लोकशाहीचा एक भाग अहे. इंदितरा गांधी, राजीव गांधी, अटल बिहारी वाजपेयी यांसारख्या लोकांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला. पण त्यांनी लोकशाही तत्वे आणि परंपरा कधीही कमजोर केल्या नाहीत कोणत्याही पक्षाशी संबंधित असले तरी प्रत्येक लोकनियुक्त सदस्याचा आम्ही सन्मान केला. त्यांच्या मतदारसंघातील न्याय्य मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी सांगितले.