मुंबई – “वंदेभारत’ अभियानांतर्गत 427 विमानांनी आतापर्यंत मुंबईत 58 हजार 233 प्रवासी आले आहेत. यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या 19 हजार 638 आहे.
आजपर्यंत आलेल्या एकूण प्रवाशांमध्ये उर्वरित महाराष्ट्रातील 19 हजार 817 प्रवासी असून इतर राज्यातील प्रवाशांची संख्या 18 हजार 778 इतकी आहे. याशिवाय 31 ऑगस्टपर्यंत आणखी 46 विमानांनी प्रवाशी मुंबईत येणे अपेक्षित आहे.
करोना विषाणूविरुद्ध शासन निग्रहाने लढत असतांना परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना मुंबईत उतरवून घेऊन त्यांना कॉरंटाईन करण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनामार्फत पार पाडली जात आहे.
बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक कॉरंटाईनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याचे काम जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना कॉरंटाईन करण्याचे काम करण्यात येत आहे.