मुंबई – अयोध्येतील प्रस्तावित राममंदिराची अख्खा देश वाट पहात होता. भूमिपूजनान सुरु झाले आहे. अवघी अयोध्या नगरी फुलांनी आणि विद्यूत रोषणाईने झळाळून निघाली आहे. शहरात केंद्रीय सुरक्षा दलांनी तळ ठोकला असून या पुरातन शहराला जणू लष्करी छावणीचे स्वरूप आले आहे. अवघ्या देशांत या निमित्ताने उत्साहाचे भरते आले असून ठिकठिकाणी दीपोत्सव आणि रांगोळ्यांचे नियोजन करण्यात आले आहे.
यातच सामना अग्रलेखातून याबाबत भाजप पक्षाचा खरपूस समाचार घेतला आहे. आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून भूमी पूजनाच्या निमंत्रणाच्या मुद्यावर निशाणा साधत ‘ऐतिहासिक सुवर्णक्षण जय श्रीराम!’ हा अग्रलेख लिहण्यात आला आहे.
काय आहे सामनाचा अग्रलेख ?
अयोध्येतील रामजन्मभूमीच्या जागेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज राममंदिराचे भूमिपूजन करीत आहेत. शरयू नदीने तेव्हा राममंदिरासाठी गोळ्या झेलणाऱ्य़ा शेकडो कारसेवकांना पोटात घेतले. रामभक्तांच्या रक्ताने लाल झालेल्या शरयू नदीच्या तीरावर भव्य मंदिराचा संकल्प पूर्ण होत आहे. हा ऐतिहासिक, रोमांचक आणि प्रत्येक हिंदुस्थानीयाची छाती गर्वाने फुलून यावी असा क्षण आहे.
‘रामायण’ हा हिंदुस्थानी जनतेचा प्राण आहे. राम हा ‘रामायणा’चा प्राण आहे. राम हा मर्यादापुरुषोत्तम, एकवचनी आहे. राम म्हणजे त्याग, राम म्हणजे साहस आहे. राम म्हणजे आपल्या देशाची एकात्मता आहे. अशा रामाचे मंदिर त्याच्याच अयोध्या नगरीत, त्याच्या जन्मस्थानी व्हावे यासाठी हिंदूंना मोठा लढा द्यावा लागला. त्या लढय़ाची सांगता आज होत आहे. हा लढा प्रत्यक्ष भूमीवर झाला आणि न्यायालयातही झाला.
राममंदिर भूमिपूजनाचे पहिले निमंत्रण अयोध्या न्यायालयीन लढाईतील मुस्लिम पक्षकार इक्बाल अन्सारी याला पाठविण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराच्या बाजूने ऐतिहासिक निकाल दिल्यानंतर रामजन्मभूमीचा वाद संपलेला आहे.
इक्बाल अन्सारी हा एकटा नव्हता, पण न्यायालयात राममंदिरविरोधी लढा देणाऱ्य़ा बाबरी ऍक्शन कमिटीचा तो एक प्रमुख चेहरा होता. त्याच्या पाठीमागे अनेक इस्लामी संघटनांनी मोठी शक्ती उभी केली होती. अन्सारीने न्यायालयातली लढाई 30 वर्षे खेचली. सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व प्रकरण तारखांच्या गुंत्यात अडकून पडले, पण न्या. रंजन गोगोई यांनी रामाला त्या गुंत्यातून बाहेर काढले व स्पष्ट निकाल राममंदिराच्या बाजूने दिला. ते न्या. रंजन गोगोई विशेष निमंत्रितांत कुठेतरी दिसायलाच हवे होते, पण रंजन गोगोई नाहीत आणि बाबरीची घुमटे पायापासून उद्ध्वस्त करणारी शिवसेनाही नाही. राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचे श्रेय दुसऱ्य़ा कुणाला मिळू नये यासाठी काय हा अट्टहास! असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय.